चेंबूर - मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या सभेत गोळीबार झाल्याची घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार संजय दिना पाटील यांनी हा गोळीबार केल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केलाय. या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय.
चेंबूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता. या मेळाव्यात पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिकही उपस्थित होते. या दरम्यान सात ते आठ बंदुकधारी आणि तलवारधारी तरुण सभेत घुसले. या तरुणांनी गोळीबार केला. यामध्ये 6 ते 7 जण जखमी असल्याचे समजतंय. "गोळीबार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील नेते आणि माजी खासदार संजय दिना पाटील आणि त्यांचे समर्थक होते," असा आरोप मलिक यांनी केलाय. तसंच "संजय दिना पाटील यांच्या हातात बंदूक होती. संजय दिना पाटील यांना पक्षातून काढले नाही तर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरेल," असं मलिक यांनी स्पष्ट केलं.
"कोणत्याही प्रकारचा गोळीबार झाला नाही. उलट नवाब मलिक यांच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांच्या गुंडांनी माझ्यावर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला. या गुंडांकडे तलवार आणि चॉपर्स होते. माझे काही कार्यकर्ते या हल्ल्यात जखमी झाले आहेत. याबाबत पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवलीय. पक्षश्रेष्ठींकडे याबाबत तक्रार करणार," अशी प्रतिक्रिया संजय दिना पाटील यांनी दिलीय.