भारतामध्ये केवळ कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या तीनच कोरोना प्रतिबंधक लसींना परवानगी देण्यात आलेली असताना मुंबईच्या (mumbai) आजूबाजूच्या परिसरात चक्क अमेरिकेतील माॅर्डना कंपनीच्या लशींद्वारे लसीकरण सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. शिवाय यावर केंद्राने खुलासा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
केंद्रावर आरोप करताना नवाब मलिक म्हणाले, देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी केंद्र सरकारने भारत बायोटेक, स्पुटनिक व सीरमच्या लसीला परवानगी दिलेली आहे. परंतु आमच्या माहितीनुसार माॅर्डना कंपनीच्या लसींद्वारे मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात लसीकरण सुरू आहे. भारतात असलेल्या परदेशातील दुतावासांसाठी खासकरून फ्रांस दुतावासातले अधिकारी आणि भारतात असलेले फ्रांसचे नागरिक यांच्या लसीकरणासाठी काही रुग्णालयात माॅर्डना लस वापरण्यात येत आहे. एवढंच नाही, तर त्यांच्या नातेवाईकांनाही ही लस दिली जात आहे.
हेही वाचा- कोरोना प्रतिबंधक लसीचं 'राष्ट्रीय धोरण' जाहीर करा- काँग्रेस
देशात लसीकरणासाठी केंद्र सरकारने भारत बायोटेक, स्पुतनिक व सिरमच्या लसीला परवानगी दिली असताना मुंबई शहराच्या आसपास मॉडर्ना कंपनीच्या लसीचे लसीकरण परदेशातील दुतावासांना कसे करण्यात येते याचा खुलासा करण्याची मागणी राष्ट्रीय प्रवक्ते ना. @nawabmalikncp यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. pic.twitter.com/hfJmDzmC41
— NCP (@NCPspeaks) May 13, 2021
त्यामुळे आमचा केंद्राला प्रश्न आहे की तुम्ही सांगता की भारतात केवळ तीनच लसींना परवानगी आहे. मग माॅर्डना लसीचं लसीकरण कुठल्या पद्धतीने सुरू आहे. जनतेसाठी परवानगी मिळत नसताना, विशेष बाब म्हणून ही परवानगी कशी देण्यात आली, याचा खुलासा केंद्र सरकारने करावा, अशी मागणीही नवाब मलिक (nawab malik) यांनी केली आहे. ही मागणी करतानाच मलिक यांनी ही लस नेमकी कुठल्या ठिकाणी आणि कुठल्या रुग्णालयात देण्यात येत आहे, हे मात्र स्पष्टपणे सांगितलेलं नाही.
दरम्यान, केंद्राकडून पुरेशा प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होत नसल्याने राज्य सरकारने तूर्तास १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. आधी देशातील सर्वांचं मोफत लसीकरण करण्यात येईल, असं म्हणणाऱ्या केंद्राने नंतर ही जबाबदारी झटकून टाकली. त्यामुळे ही जबाबदारी राज्य सरकारवर येऊन पडलेली आहे. त्यातच अपुऱ्या लसींमुळे राज्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे केंद्राने लसीकरणाचं धोरण ठरवावं, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे.
(how moderna vaccine use in india for french embassy staff asks ncp leader nawab malik)