भारतीय लष्कराच्या १२ विमानांनी मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत दहशतवाद्यांना चोख प्रतिउत्तर दिल्याची प्रतिक्रिया भारतीय परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली. या हल्यात २०० हून अधिक दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांना मारण्यात यश आलं आहे. भारताचा हा आतापर्यंतचा सर्वात घातक हल्ला असल्याचंही गोखले यांनी स्पष्ट केलं.
पुलवामा हल्ल्याला १२ दिवस उलट नाही, तोच दहशतवाद्यांना आणि त्यांचे समर्थन करणाऱ्यांना भारतील लष्कराच्या हवाई दलानं मंगळवारी चोख प्रतिउत्तर दिलं. मंगळवारी भारतीय लष्कराच्या हवाई दलानं पाकव्याप्त काश्मिरमधील जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोएबा या दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर हा हवाई हल्ला केला आहे. हे हवाई हल्ले प्रामुख्यानं मुझ्झफराबादमार्गे पाकिस्तानात प्रवेश करत केले आहेत. या कारवाईत जैश मोहम्मदच्या अनेक दहशतवादी आणि म्होरक्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या कारवाईत नागरी वस्त्यांवर हल्ला केला नाही. बालकोट, चकोटी, मुझ्झफराबाद इथल्या दहशतवादी तळांवरच हा हल्ला करण्यात आला असल्याचं गोखले यांनी स्पष्ट केलं.
भारताविरोधात २० वर्ष जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना पाकिस्तानातून कट रचत होती. मात्र आजपर्यंत त्यांच्यावर पाकिस्तानमधून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. दहशतवाद्यांच्या अस्तित्वाचे अनेकदा पुरावे देऊन देखील दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. वेळोवेळी पाकिस्ताननं दहशतवाद्यांची पाठराखण करत, त्यांचे अस्तित्व नसल्याचं स्पष्ट केलं होतं. हे दहशतवादी पुन्हा एकदा भारताविरोधात दहशतवादी कट रचण्याच्या प्रयत्नात होते. या दहशतवाद्यांना त्यांच्या तळावर प्रशिक्षणही दिले जात होते. त्यामुळे भारताकडून हवाई हल्ला करत दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केल्याचं गोखले यांनी सांगितलं. जैश-ए-मोहम्मदच्या कंट्रोल रुमवर हा हल्ला करण्यात आला. याच कंट्रोल रूममधून पुलवामा हल्याचा कट रचण्यात आला असंही परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा -
भारताचा पाकवर एअर स्ट्राईक, देशभरातून हल्ल्याचं स्वागत