महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सकाळी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन राज्याचे केंद्राकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे भेटीच्या वेळी उपस्थित होते.
या भेटीनंतर महाराष्ट्र सदन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी बैठकीतील मुद्दे मांडले.
राज्याच्या प्रलंबित विषयांसाठी मा. पंतप्रधानांची भेट घेतली. या दरम्यान व्यवस्थित चर्चा झाली. पंतप्रधानांनी सर्वच विषय गांभीर्याने ऐकले. केंद्राकडे प्रलंबित आहेत अशा प्रश्नांवर ते सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
या भेटीत कुठेही राजकीय अभिनिवेश नव्हता. मी आणि माझे सहकारी समाधानी आहोत. या प्रश्नांवर पंतप्रधान माहिती घेऊन पुढील कार्यवाही निश्चितपणे केली जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा- आरक्षणाबाबत ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करा, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी