सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर करा, आधी पेशंटच्या खाटांचं बघा, असं म्हणत भाजप आमदार राम कदम यांनी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये रंगलेल्या मानापमान नाट्यावर टीका केली (maha vikas aghadi government should focus on providing beds to corona patients in mumbai says bjp mla ram kadam) आहे. शिवाय सामनातील अग्रलेखातून शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीची लाज काढली, तरी काँग्रेस-राष्ट्रवादीत स्वाभिमान शिल्लक आहे का? असा प्रश्न देखील राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
काँग्रेस नेत्यांमध्ये अस्वस्थता
मानापमान नाट्यावरून सध्या महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांत कुरबुरी सुरू आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असून देखील निर्णय प्रक्रियेत काँग्रेसच्या मंत्र्यांना विश्वासात घेत नसल्याचं म्हणत काँग्रेसचे नेते प्रसार माध्यमांपुढे जाहीररित्या आपली अस्वस्थता व्यक्त करत आहेत. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निधी वाटपात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना झुकतं माप देत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. त्यातच विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या १२ जागांमध्ये तिन्ही पक्षांना समान ४ जागा मिळाव्यात, असाही काँग्रेसचा आग्रह आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी काँग्रेसच्या नेत्यांची मागणी आहे.
हेही वाचा - खाट का कुरकुरतेय? शिवसेनेचा काँग्रेसला चिमटा
सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर, आधी पेशंटचा खाटाचा बघा ?
— Ram Kadam (@ramkadam) June 16, 2020
सामनातून काँग्रेस-राष्ट्रवादीची लाज काडलीं ? काँग्रेस-राष्ट्रवादीत स्वाभिमान शिल्लक आहे का? - सामना अग्रलेख – खाट का कुरकुरतेय? - https://t.co/fwB95CMviW
शिवसेनेची टीका
त्यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातील अग्रलेखातून काँग्रेसला चिमटा काढण्यात आला आहे. आघाडीच्या सरकारात अधूनमधून असं कुरकुरणं सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठेवली पाहिजे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे कुरकुरणंही तसं संयमी असतं. घरात भावाभावांची भांडणे होतात. इथं तर तीन पक्षांचे सरकार आहे. थोडंफार कुरकुरणं होणारच. ‘मुख्यमंत्र्यांना भेटून काय ते बोलू,’ असं थोरातांनी सांगितलं. त्याच खाटेवर बसलेल्या अशोक चव्हाण यांनीही ‘इंडियन एक्सप्रेस’ला एक जोरदार मुलाखत दिली व तितक्याच संयमाने कुरकुरत सांगितलं की, ‘‘सरकारला अजिबात धोका नाही, पण सरकारमध्ये जरा आमचंही ऐका.
चिंता करू नका
काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असं नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करू नये, इतकंच शेवटी सांगायचं, असं म्हटलं आहे.
रुग्णांच्या खाटांचं बघा
त्यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्रात कोरोनाचं संकट वाढत असलं, तरी सत्ताधाऱ्यांना आपल्या खाटेचीच चिंता दिसून येत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या रुग्णांना रुग्णालयात खाटा मिळणंही मुश्कील झालं आहे. तेव्हा सत्ताधाऱ्यांनी सत्तेची चिंता बाजूला ठेवून रुग्णांना मदत मिळण्याकडे आपलं लक्ष केंद्रीत करावं, असा सल्ला भाजपचे राम कदम यांनी दिला आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा अपमान करून देखील ते सत्तेत कसे, त्यांचा स्वाभीमान शिल्लक आहे का? असा प्रश्न देखील कदम यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - काँग्रेस हट्टाला पेटली, हव्यात विधान परिषदेच्या ‘इतक्या’ जागा