दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघांचे पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करण्यासाठी गेट वे ऑफ इंडियाजवळ विद्यार्थ्यांचं मध्यरात्रीपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सोमवारी दुपारी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड देखील सहभागी झाले. या हल्ल्याचा निषेध करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
हेही वाचा- जेएनयूमधील हल्ल्याचे मुंबई, पुण्यात पडसाद
या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं रविवारी मध्यरात्री विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढला होता. त्यानंतर हे विद्यार्थी सकाळीही आंदोलनाला बसले. या आंदोलनात सहभागी होत जितेंद्र आव्हाड यांनी जेएनयूमधील हल्ल्याचा तीव्र निषेध केला.
यावेळी ते म्हणाले की, सरकार कुणाचंही असलं तरी विद्यार्थ्यांना मारहाण चुकीचंच आहे. विद्यार्थ्यांवर हल्ला करणं हे अराजकतेचं प्रतिक असून सरकार विद्यार्थ्यांच्या हुशारीला घाबरते हेच यावरून स्पष्ट होत आहे. मी देखील विद्यार्थी चळवळीतून आलेलो असल्याने माणुसकी धर्म म्हणून या आंदोलनात सहभागी झालो आहे. हा हल्ला डाव्या संघटनांनी केला असं म्हणणं म्हणजे दरोडेखोराने उलट्या बोंबा मारण्याचा प्रकार असल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा- मनसे लोणच्याएवढीही उरली नाही, शिवसेना नेत्याची राज ठाकरेंवर टीका