“एनडीएच्या नावावर टिवटिव करणारे, त्यावेळी गोधडीत रांगतही नव्हते”, अशा खरमरीत शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी भाजपच्या नेत्यांवर टीका केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी राऊत दिल्लीत दाखल झाले आहेत.
शिवसेनेला ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ (NDA)तून बाहेर काढण्यात आल्याची घोषणा रविवारी करण्यात आली. शिवसेनेच्या खासदारांची बसण्याची जागा विरोधी बाकांवर करण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा- 'काॅमन मिनिमम प्रोग्राम'मागचं गुपित
भाजपच्या घोषणेचा समाचार घेताना राऊत म्हणाले, शिवसेना ‘एनडीए’चा संस्थापक घटक पक्ष आहे. शिवसेेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एनडीएचे संस्थापक होते. जॉर्ज फर्नाडीस निमंत्रक होते. फर्नाडीस हे ‘एनडीए’तील सर्व घटक पक्षांशी संवाद साधायचे. ‘एनडीए’च्या नावानं टिव-टिव करणारे ज्यावेळी एनडीए स्थापन झाली, तेव्हा गोधडीत रांगतही नव्हते.
तसंच “जॉर्ज फर्नांडीस ‘एनडीए’चे शेवटचे निमंत्रक होते. पण सध्या एनडीएचे नेते कोण आहेत? कुणाच्या सहीने शिवसेनेला बाहेर काढले?नितीश कुमार जाऊन येऊन एनडीएत असतात. आधी बैठक घेतली असती, तर शिवसेनेने भूमिका स्पष्ट केली असती. पण हा निव्वळ योगायोग नसून जाणीवपूर्वक केलेलं क्रौर्य आहे,” असंही राऊत म्हणाले.
शिवसेनेनं १०५ जागा असलेल्या भाजपसोबत सरकार स्थापन करण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्या आहेत.
हेही वाचा-
अखेर 'एनडीए'तून शिवसेना बाहेर, भाजपकडून शिक्कामोर्तब
राज्यात भाजपशिवाय सरकार स्थापन होऊच शकत नाही, चंद्रकांत पाटील यांचा दावा