शिवसेना-भाजपमध्ये जागा वाटपात ज्या मतदारसंघावरून वाद सुरू होता. त्यापैकी एक मतदारसंघ म्हणजे मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघ. मुंबईच्या ७ बेटांपैकी वडाळा हे एक बेट होतं. अखंड मुंबई करताना या बेटाचाही मुंबईत समावेश करण्यात आला. या मतदारसंघाचा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. आधी शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजप असा प्रवास करत आलेले कालिदास कोळंबकर या मतदारसंघातून सगल ७ वेळा विजयी झाले आहेत.
नायगाव, शिवडी-कोळीवाडा, भोईवाडा, कोरबा मिठागर असा परिसर वडाळा मतदारसंघात येतो. मराठी, मुस्लिम, दलित, ख्रिश्चन अशा सर्व धर्माचे मतदार या परिसरात आहेत. गिरणी कामगार, झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे रहिवासी, मराठी भाषिकांनी शिवसेनेत असलेल्या कोळंबकरांना नेहमीच साथ दिला. त्यानंतर २००५ मध्ये शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या कोळंबकराची साथ २००९ च्या निवडणुकीतही या मतदारांनी सोडली नाही.
पण २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे मिहीर कोटेचा यांनी मात्र त्यांना कडवी टक्कर दिली. माटुंगा आणि आजुबाजूच्या जैन, गुजराथी, कच्छी समाजाच्या जोरावर यांना भरभरून मतं मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत कोळंबकर यांनी कोटेचा यांचा अवघ्या ८०० मतांनी पराभव केला. कोटेचा दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
मतदारांचा बदलता कल पाहत कोळंबकर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला जवळ केलं. पोलिस वसाहतींचा पुनर्विकास, गिरणी कामगारांचा प्रश्न, मतदारसंघातील विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून न्याय मिळत असल्याचं सांगत ते मतदारांना निवडून देण्याचं आवाहन करत आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचं संघटनही मजबूत असून माजी महापौर श्रद्धा जाधव इथून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. त्यामुळे शिवसेनेची नाराजी त्यांच्यासाठी डोकेदुखीची ठरू शकते. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे शिवकुमार लाड आहेत, तर वंचित बहुजन अघाडीचे लक्ष्मण काशिनाथ पवार, मनसेकडून आनंद प्रभू देखील निवणुकीच्या रिंगणात आहेत.. त्यामुळे इथले सर्वसामान्य मतदार काँग्रेसच्या मागे उभे राहतात की कोळंबकरांच्या हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मतदानाची टक्केवारी – ६१.३९ %
हेही वाचा-
Maharashtra Assembly Election - वरळी मतदारसंघात शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला
Maharashtra Assembly Election - मानखुर्द शिवाजीनगरमधून अबू आझमी हॅटट्रिक करणार?