उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात दोन साधुंची मंदिरात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्येचा निषेध करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करून चिंता व्यक्त केली. तसंच ज्याप्रकारे महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारच्या घटनेत कठोर कारवाई केली आहे, तशी कारवाई तिथलं सरकार देखील करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
यासंदर्भात आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आत्ता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा करून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर इथं घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवर चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटनेविरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत, असं त्यांना सांगितलं.
हेही वाचा- यूपीतल्या साधू हत्याकांडावरून राऊतांचा भाजपला टोमणा, म्हणाले पालघरसारखं राजकारण नको
मैंने उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री @myogiadityanath जी से फोन पर बात की और उत्तर प्रदेश के बुलंदशहर में हुए दो साधुओं की अमानवीय हत्या पर चिंता व्यक्त की। ऐसे घृणास्पद कृत्यों के खिलाफ हम सब आपके साथ हैं।
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 28, 2020
ज्या प्रकारे आम्ही अशा प्रकारच्या घटनेमध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे तुम्ही सुद्धा कराल आणि दोषींना कडक शिक्षा कराल, अशी अपेक्षा व्यक्त केली. परंतु कोणीही या घटनांना धार्मिक रंग देऊ नये असं आवाहन करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.
योगींना टोला
याआधी पालघरमध्ये दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरची जमावाने हत्या केली होती. त्यावेळी योगींनी मुख्यमंत्र्यांना फोन करत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली होती. तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या हत्याप्रकरणातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील. पण ज्या पद्धतीने पालघरच्या घटनेला धार्मिक रंग देऊन त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसा प्रयत्न या घटनेबाबत होऊ नये, असं आवाहन करत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला सुनावलं.