Advertisement

पोलिओच्या डोसप्रमाणे घरोघरी जाऊन कोरोना लस द्या, काँग्रेसची सरकारकडे मागणी

पोलिओच्या डोसप्रमाणेच घरोघरी जाऊन कोरोनाची लस दिली, तर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात मोठं यश येईल, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

पोलिओच्या डोसप्रमाणे घरोघरी जाऊन कोरोना लस द्या, काँग्रेसची सरकारकडे मागणी
SHARES

पोलिओच्या डोसप्रमाणेच घरोघरी जाऊन कोरोनाची लस दिली, तर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात मोठं यश येईल, असं म्हणत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना पत्र लिहून घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नाना पटोले यांनी नमूद केलं आहे की, कोरोना महामारीने मानवजातीसमोरच गंभीर संकट उभं ठाकलं असून दुसऱ्या लाटेत संक्रमण मोठ्या वेगाने होत आहे. शहरी भागात मोठ्या प्रमाणात पसरलेलं हे संक्रमण आता गाव-खेड्यातही मोठ्या प्रमाणात पोहचलं आहे. वर्षभरापासून आपण या संकटाचा सामना करत आहोत. 

रुग्णालयात बेड्स मिळत नाहीत, रेमडेसिवीर, ऑक्सिजनअभावी दररोज लोकांचे जीव जात आहेत. हे भयानक चित्र पहावत नाही. एकीकडे जीवितहानी होत असताना अर्थचक्रही सुरुळीत चालण्यात अडथळे येत आहेत. कोरोनामुळे वर्षभरात सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसलेला आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी आपली यंत्रणा सर्व पातळ्यांवर काम करत आहे. कोरोनावर मात करण्याकामी लसीकरणच प्रभावी औषध सिद्ध झालेलं आहे. इस्त्राइल सारख्या देशाने ते करून दाखवलं आहे. अमेरिका, ब्रिटनसह इतर देशानेही लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविल्याने कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. महाराष्ट्रानेही देशात लसीकरणात मोठी आघाडी घेऊन १ कोटीपेक्षा जास्त लसीकरण केलं आहे.

हेही वाचा- कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना; राज ठाकरेंकडून प्रतिक्रिया

राज्य सरकारने सध्या लावलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्यांना लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेण्यास अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात लसीकरण केंद्रे संख्येने कमी आणि दूर अंतरावर असल्याने प्रवास करून केंद्रांवर जाऊन लस घेणं लोकांसाठी जिकीरीचं ठरत आहे. लसीकरणातील या सर्व अडचणी दूर करून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यासाठी ‘घरोघरी जाऊन लस देण्याची मोहीम’ हाती घेतली, तर मोठ्या प्रमाणात कोरोनावर (coronavirus) मात करता येऊ शकेल. ही लसीकरण मोहीम राबवण्यासाठी मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात लागणार आहे हे लक्षात घेऊन सरकारी यंत्रणेबरोबरच, खाजगी रुग्णालयातील कर्मचारी वर्ग, स्वयंसेवी संस्था-संघटनांची मदत घेता येईल.

पोलिओ या महामारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देशपातळीवर मोठ्या प्रमाणात अशीच मोहीम राबवण्यात आली होती. याचधर्तीवर घरोघरी जाऊन कोरोनाची लस दिली तर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात मोठे यश येईल. या संकटावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करावं ही काँग्रेस (congress) पक्षाची पहिल्यापासूनची आग्रही मागणी राहिली आहे. काँग्रेसच्या मागणीचा विचार करून आपण योग्य तो निर्णय घ्यावा, असं नाना पटोले म्हणाले.

(maharashtra congress president nana patole demands door to door covid 19 vaccination in state)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा