केंद्रातलं मोदी सरकार हे इंग्रज राजवटीपेक्षा जुलमी आणि अत्याचारी आहे. हे सरकार शेतकरी, कष्टकरी विरोधी असून शेतकऱ्यांना भांडवलदारांचं गुलाम बनवून देशोधडीला लावण्याचं काम करत आहेत. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी या सरकारने ३ काळे कृषी कायदे आणले आहेत. त्यामुळे हे सरकार घालवल्याशिवाय या देशातील शेतकरी, कष्टकरी यांना अच्छे दिन येणार नाहीत, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांचे दहन करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या उत्तर महाराष्ट्र (maharashtra) दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधानांकडे वेळ नाही
कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर ६ महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनात ४०० शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. परंतु हाकेच्या अंतरावर असलेल्या नरेंद्र मोदी यांनी या शेतकऱ्यांची साधी भेटही घेतली नाही. शेतकरी थंडी, ऊन पावसात आंदोलन करत असताना पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमधील प्रचारात व्यस्त होते. हे जुलमी कायदे रद्द झालेच पाहिजेत अशी काँग्रेसची (congress) भूमिका आहे.
काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी संसदेत तसेच संसदेच्या बाहेर रस्त्यावरही भाजपाच्या (bjp) जुलमी सरकारविरोधात लढा देत आहे आणि यापुढेही देत राहू. जनतेचे हीत हेच काँग्रेससाठी सर्वात महत्वाचं आहे, असं नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा- ‘हा’ तर ओबीसींवर घोर अन्याय- पंकजा मुंडे
केंद्रातील मोदी सरकार इंग्रज राजवटीपेक्षाही जुलमी, अत्याचारी! - मा. नाना पटोले https://t.co/E0lclw2JlB
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 23, 2021
कोरोना हाताळण्यात अयशस्वी
देशातील कोरोनाची (coronavirus) परिस्थिती हाताळण्यातही मोदी सरकार अपयशी ठरलं आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह, सोनियाजी, राहुलजी यांनी कोरोना संदर्भात महत्वाचे सल्ले दिले होते. परंतु त्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. याची किंमत देशाला हजारो बळी देऊन मोजावी लागली आहे.
कालच राहुलजी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल इशारा देत योग्य ती पावले उचलण्याची मागणी केली आहे. मागील २ लाटेत मोदी सरकारच्या अक्षम्य चुकांमुळे निष्पाप लोकांचे बळी गेले. आतातरी सरकारने जागं व्हावं आणि वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
बेरोजगारी वाढली
मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या काळात देशात अनागोंदी वाढली आहे. पीक वीमा योजनेतूनही शेतकऱ्यांना लुटलं जात आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल मोठ्या प्रमाणात महाग झालं आहे, बेरोजगारी वाढली आहे. याविरोधात काँग्रेस लढा देत आहे. कोरोना संकटामुळे मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्यास बंधने आहेत. मात्र काँग्रेसने कोरोनाचे नियम पाळून मोदी सरकारच्या विरोधात आंदोलने केली आहेत आणि पुढंही करत राहू, असं नाना पटोले म्हणाले.
(maharashtra congress president nana patole slams modi govt on farm bills)