केंद्रातील संयुक्त पुरोगामी सरकारच्या काळात (यूपीए) झालेल्या इंधन दरवाढीविरोधात आवाज उठवणारे अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार भाजप सरकारच्या काळात होत असलेल्या इंधन दरवाढीविरोधात गप्प का आहेत? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. एवढंच नाही तर या दोघांनी त्वरीत आपली भूमिका मांडावी अन्यथा त्यांचे सिनेमे आणि शुटिंग बंद पाडू, असा इशारा देखील पटोले यांनी दिला आहे.
इंधन दरवाढीवरून काँग्रेस (congress) आक्रमक होताना दिसत आहे. या आक्रमकतेकडे जनतेचं लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसने लोकप्रिय कलाकारांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी केंद्र सरकारसोबतच सेलिब्रिटींवरही निशाणा साधला. ते म्हणाले, जेव्हा केंद्रात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील लोकशाहीच्या मार्गावर चालणारं यूपीएचं सरकार होतं, तेव्हा पेट्रोल ७० रुपये प्रति लिटरवर गेल्यावर अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि इतर सेलिब्रिटींनी इंधन दरवाढीविरोधात ट्विट करून संताप व्यक्त केला होता.
हेही वाचा- यापुढं महाराष्ट्रात काँग्रेसच एक नंबरचा पक्ष- नाना पटोले
युपीएच्या काळात इंधनाचे दर ७० रु झाल्यावर टीव टीव करणारे @SrBachchan, @akshaykumar आज पेट्रोलचे दर १०० रु. झाल्यावरही गप्प का आहेत? सर्वसामान्य जनतेची लूट करणाऱ्या मोदी सरकारविरोधात गप्प असणाऱ्या या सेलिब्रिटींच्या पिक्चरचे शुटींग महाराष्ट्रात होऊ देणार नाही.. pic.twitter.com/PEmirXQIe6
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 18, 2021
आता पेट्रोलने शंभरी गाठली आहे. गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं जगणं मुश्कील झालं आहे. अश स्थितीत हे गप्प का आहेत? मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात बोलण्याची हिम्मत नाही का? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला.
यूपीए सरकारच्या काळात ते ज्या प्रकारे ट्विट करून भूमिका मांडत होते. तशी भूमिका त्यांनी मोदी सरकारच्या देशविरोधी धोरणाच्या बाबतीतही मांडावी. अन्यथा महाराष्ट्रात त्यांचे सिनेमे आणि शुटिंग बंद पाडू, असंही नाना पटोले म्हणाले.
केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून सर्वसामान्य जनतेचं जगणं कठीण झालं आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात दररोज होत आहे. सध्या पेट्रोल प्रति लिटर ९६ रुपये, तर डिझेल ८६ रुपये लिटर झालं आहे. त्यातच घरगुती वापराचा गॅस सिलेंडर ८०० रुपये झाला आहे.
कोरोना संकटामुळे आधीच लाखो लोकांच्या उत्पन्नावर मर्यादा आलेली असताना इंधन दरवाढ करून मोदी सरकारने लूट चालवली आहे. मोदी सरकारने इंधन दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देखील नाना पटोले यांनी दिला.
(maharashtra congress president nana patole warns actor amitabh bachchan and akshay kumar on fuel price hike)