पालघरमध्ये घडलेल्या माॅब लिंचिंगची घटना ही अफवा आणि गैरसमजूतीतून घडलेली आहे. त्यामुळे या घटनेला धार्मिक रंग देऊन आग लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, अशा स्पष्ट शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेचं राजकारण करून सोशल मीडियाद्वारे द्वेष पसरवणाऱ्यांना ठणकावलं आहे. उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आणि माॅब लिंचिंगच्या घटनेवर खुलासा केला.
पालघरमधील घटना नाही
मॉब लिंचिंगची घटना पालघरमध्ये घडलेली नाही. ही घटना पालघरपासून ११० किलोमीटरवर अंतरावर असलेल्या दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशच्या सीमेवरील गडचिंचोली गावात घडली आहे. हा अत्यंत दुर्गम भाग आहे. रस्ता नसल्याने महाराष्ट्रातील पोलिसांनाही दादरा आणि नगर हवेलीतून वळसा घालून गडचिंचोलीला जावं लागतं. हे साधू दादरा आणि नगर हवेलीत गेले होते. पण त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. तिथून परतत असताना हा प्रकार घडला.
हेही वाचा - लाज वाटली पाहिजे, माॅब लिंचिंगमध्ये सामील भाजपचेच, सचिन सावंत यांचा गंभीर आरोप
मी तुम्हाला वचन देतोय यात जे कोणी गुन्हेगार असतील, जे कोणी आरोपी असतील त्यांनी हत्या तर केलेलीच आहे आणि पोलिसांवर सुद्धा हल्ला केला आहे. ते हल्लेखोर सुटणार नाही, सुटू शकत नाही. जो विश्वास तुम्ही महाराष्ट्र सरकारवर दाखवतात, हेच आमचं बळ आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 20, 2020
कठोर शिक्षा देणार
गडचिंचोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून अफवा पसरल्या होत्या. त्याच गैरसमजूतीतून गुरुवारी मध्यरात्री जमावाने २ साधू आणि त्यांच्या चालकाची चोर समजून हत्या केली. या गावातील लोकांनी माणुसकी धर्म पाळायला हवा होता. त्यांना रात्रभर ठेवून सकाळी महाराष्ट्र पोलिसांच्या हवाली करायला हवं होतं. असं केलं असतं तर हा प्रकार घडला नसता.
यात कोणत्याही जातीपातीचा आणि धर्माचा संबंध नाही. या घटनेमागे कोणतंही धार्मिक कारण नाही. धर्मांधताही नाही. हिंदू-मुस्लिम वादही नाही. त्यामुळे कुणीही धर्माधर्मात आगी लावण्याचं काम करू नये, असा इशारा या घटनेवरून राजकारण करणाऱ्यांना तसंच सोसश मीडियावरून चुकीचे मेसेज व्हायरल करणाऱ्यांना दिला आहे.
आरोपींना घेतलं ताब्यात
पालघर इथं मॉब लिंचिंगची घटना घडल्याचं उघडकीस होताच पोलिसांनी घटनास्थळी जावून आरोपींना तात्काळ ताब्यात घेतलं. पोलिसांनी एकूण १००हून अधिक जणांना अटक केली असून त्यात ५ मुख्य आरोपी आणि ९ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. इतर आरोपी दादरा नगर हवेली आणि महाराष्ट्रातील काही भागात लपल्याची शक्यता असून त्यांचाही शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणातील ९ अल्पवयीन आरोपींना सुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. तर इतर आरोपींना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या बळावर जसं आपण कोरोनाच युद्ध जिंकणार आहेत, तसं गुंडगिरी आणि सोशल मीडिया वरून आग लावणारे लोकं आहेत त्यांनासुद्धा लवकरात लवकर पकडणे गरजेचं आहे. याबद्दल अमित शहांशी बोललो आहे, राज्य सरकारला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 20, 2020
हेही वाचा - महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? पालघर हत्या प्रकरणावरून फडणवीसांचा सवाल
पोलिसांचं निलंबन
पालघर घटनेप्रकरणी २ पोलिसांना निलंबित करण्यात आलं असून हे प्रकरण सीआयडी, क्राइमकडे सोपविण्यात आलं आहे. सीआयडीचे अधिकारी अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.