पालघरच्या घटनेत एकही मुस्लिम (muslim) व्यक्ती सामील नव्हता. सध्याच्या घडीला संपूर्ण प्रशासन कोरोनाशी लढा देण्यात गुंतलेलं असताना दुर्दैवाने घटनेला हाताशी धरून जातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेत कोण कोण सामील होते, याची माहिती देण्यासाठी आरोपींची यादी सादर करत असल्याचं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (maharashtra home minister anil deshmukh) यांनी केलं.
गैरसमजूतीतून घटना
पालघरमध्ये घडलेल्या माॅब लिंचिंगच्या (Palghar mob lynching) घटनेवरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सध्या गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे या घटनेवर खुलासा करण्यासाठी देशमुख यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील गडचिंचले चौकीपाडा इथं जमावाकडून २ साधू आणि एका ड्रायव्हरची हत्या करण्यात आली. ही घटना चोर आले या गैरसमजूतीतून घडली आहे. ही घटना घडल्यानंतर पुढील ८ तासांत या घटनेत सामील असलेल्या १०१ जणांना ताब्यात घेण्यात आलं. या हत्याकांडातील बहुतेक सर्व आरोपी आजूबाजूच्या जंगलात पळून गेले होते. त्या सर्वांना जंगलातून शोधून काढत ताब्यात घेण्यात आलं. शिवाय या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे (CID) सोपवण्यात आला असून या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
हेही वाचा - पालघर हत्या: योगी आदित्यनाथांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, कडक कारवाईची मागणी
पालघर येथील घटनेत अटक झालेल्या १०१ जणांची यादी इथे सार्वजनिक करण्यात येत आहे. जी विघ्नसंतोषी मंडळी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा सातत्याने प्रयत्न करत होती, त्यांनी नक्की पहावी...#ZeroToleranceForCommunalism#LawAndOrderAboveAll pic.twitter.com/pjouXo9NhQ
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 22, 2020
द्वेष पसरवण्याचा प्रयत्न
एका बाजूला राज्याचं प्रशासन कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्यात व्यस्त असताना या प्रकरणाला जातीय रंग देत समाजात विद्वेश पसरवण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. ही घटना घडत असताना ‘ओये बस’च्या ऐवजी शोएब असं बोललं जात असल्याच गैरसमज पसरवण्यात आला. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. सध्याच्या स्थितीत या घटनेवरून राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आहे. त्यामुळेच पालघर येथील घटनेत अटक झालेल्या १०१ जणांची यादी सोशल मीडियावर सार्वजनिक करण्यात येत आहे. जी विघ्नसंतोषी मंडळी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा सातत्याने प्रयत्न करत होती, त्यांनी ही यादी नक्की पहावी, असं आवाहनही अनिल देशमुख यांनी केलं.
काय आहे प्रकरण?
गुरूवार मध्यरात्री १७ एप्रिल रोजी दाभाडी-खानवेल मार्गावरून हे तिघेही आपल्या कारमधून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. त्यांनी ही कार थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने कारमधील तिघांनाही चोर समजून लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप दिला आणि त्यांना दगडाने ठेचून मारलं. ही घटना पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले इथं घडली होती.
हेही वाचा - लाज वाटली पाहिजे, माॅब लिंचिंगमध्ये सामील भाजपचेच, सचिन सावंत यांचा गंभीर आरोप
या घटनेची माहिती मिळताच कासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरीही होते. या सर्वांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने शांत होण्याऐवजी पोलिसांच्या गाडीवरही हल्ला करत दगडफेक केली. यामध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला. पोलिसांच्या उपस्थितीत ही घटना घडल्याने राज्यभर खळबळ उडाली होती.