मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणारी बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला केंद्र सरकारने ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवणं हा धक्कादायक प्रकार असल्याचं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. (maharashtra home minister anil deshmukh raise questions on central govt providing y security to actress kangana ranaut)
केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवार ७ सप्टेंबर रोजी कंगना रणौतला वाय श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. कंगना रणौत आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात झालेल्या शाब्दिक युद्धात संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत न येण्याचा सल्ला दिला. त्यावर कंगनाने मुंबईत येणारचं असं ठणकावून सांगितलं आहे. या वादामुळे शहरात कंगनाच्या जीवाला असलेला धोका आणि शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेता कंगनाला ही सुरक्षा पुरवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
यावर वृत्तसंस्थेशी बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला केंद्राकडून ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येते हा प्रकार आश्चर्यकारक आणि दु:खद आहे. महाराष्ट्र हा काही एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांचाच नाही, तर भाजपाचा आणि अवघ्या जनतेचा देखील आहे. महाराष्ट्राचा जर कुणी अपमान करत असेल, तर त्याचा सगळ्याच पक्षातील लोकांनी निषेध करायला हवा.
हेही वाचा - कंगना रणौतविरोधात मुंबईत तक्रार दाखल
It is surprising and sad that those who insult Mumbai and Maharashtra, are being given 'Y' level security by centre. Maharashtra is not only of NCP, Shiv Sena or Congress but of BJP & the public too. People of all party should condemn it if one insults Maharashtra: Maharashtra HM https://t.co/ukkAGCARqZ pic.twitter.com/DskUm3QuO4
— ANI (@ANI) September 7, 2020
दरम्यान अभिनेत्री कंगना रणौतविरोधात मुंबईच्या खार आणि आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. खार इथं संतोष देशपांडे आणि आझाद मैदानात काँग्रेसचे कार्यकर्ते निजामुद्दीन रायन यांनी तक्रारी दाखल केली आहे. मुंबई पोलिसांविरोधात वादग्रस्त ट्विट केल्यानं ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारदार संतोष देशपांडे यांनी शनिवारी सांगितलं की, 'मी या अभिनेत्रीविरोधात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. कारण तिच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमानाला तडा गेला आहे. तिनं केलेलं ट्विट भडकाऊ आहेत त्यामुळे राज्यभरात अनेक निदर्शनं होत आहेत. मुंबई पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही तर मी न्यायालयात जाईन.
देशपांडे पुढे म्हणाले, 'अभिनेत्रीनं केलेलं ट्विट योग्य नाही आणि तिची विधानं लोकांना भडकणारी आहेत. तिनं आपल्या बोलण्याच्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला आहे. ती लोकांच्या मनात विष पेरण्यासाठी सोशल मीडियाचा देखील दुरुपयोग करत आहे.
याचदरम्यान कंगनाने येत्या ९ सप्टेंबर रोजी आपण मुंबईत येत असून कुणाला काय वाकडं करून घ्यायचं आहे, ते करून घ्यावं, असं खुलं आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलं आहे.