अभिनेत्री कंगना राणावतच्या वक्तव्याने मुंबई पोलिसांची बदनामी होत आहे. त्यामुळे आमचे पोलीस अधिकारी तिच्या वक्तव्याची तपासणी करून योग्य तो निर्णय घेतील, असं मत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे कंगनावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (mumbai police will inspect statement of actress kangana ranaut says maharashtra home minister anil deshmukh)
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून कंगना राणावत सातत्याने मुंबई पोलिसांला लक्ष्य करत आहे. बाॅलिवूड आणि ड्रग्ज माफियांचं कनेक्शन असल्याचं सांगणाऱ्या कंगनाला मुंबई पोलिसांनी संरक्षण द्यावं, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली होती. त्यावर खरंतर गुंड आणि मुव्ही माफियांपेक्षा मला आता मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकारची किंवा थेट केंद्राची सुरक्षा हवी आहे. मुंबई पोलिसांची नको, प्लीज, असं म्हणत कंगनानं मुंबई पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
त्यापाठोपाठ शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला खुली धमकी दिली आहे. तसंच मला मुंबईत येऊ नये असंही बजावलं आहे. मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे?
हेही वाचा - मुंबईला रक्ताची चटक लागली, आंदोलनानंतर कंगना बिथरली
सुशांतला आणि साधूंना मारल्यानंतर आता प्रशासनाविरोधात मत व्यक्त केलं म्हणून माझ्या पोस्टरला जोडे मारताय... मुंबईला रक्ताची चटक लागली आहे वाटतं... असे ट्विट करत कंगना वादात भर घालत सुटली आहे.
त्याबाबतच विचारलं असता, कंगनाने मुंबई पोलिसांची बदनामी केली आहे. त्यामुळे कंगनाला महाराष्ट्रासह मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. कंगनामुळे मुंबई पोलिसांची बदनामी होत आहे. आमचे पोलीस अधिकारी तिच्या विधानाची पाहणी करतील आणि त्यानंतर काय तो निर्णय घेतील, असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
दरम्यान कंगना राणावत हिच्या मुंबई बद्दलच्या ट्वीट विरोधात शिवसेनेच्या महिला आघडीनं ठाण्यात कंगनाच्या पोस्टरला काळं फासलं. तिच्या पोस्टरला जोडे मारले. कंगनाला मुंबईत पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा देखील यावेळी महिला शिवसैनिकांनी दिला.
ठाण्यात आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळाजवळ हे आंदोलन करण्यात आलं. महिला शिवसैनिकांनी या वेळेस कंगनाच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. कंगना राणावत हिनं केलेलं वक्तव्य हे निषेधार्य आहे. ती जर असंच बालिश वक्तव्य करत असेल तर तिच्या सर्व चित्रपटांवर आम्ही बहिष्कार टाकू. ती ९ सप्टेंबरला मुंबईत येत असेल तर तिचं शिवसेना स्टाईलमध्ये शिवसेनेच्या महिला स्वागत करतील, असा इशारा माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दिला आहे.
हेही वाचा - आम्ही पोकळ धमक्या देत नाही, संजय राऊतांचा कंगनाला इशारा