मंत्रालयात वारंवार आत्महत्या होणं सरकारला भूषणावह नाही. सरकारने यावर गांभीर्याने विचार करायला हवा, असा सल्ला नारायण राणे यांनी सरकारला शुक्रवारी दिला. राणेंच्या मंत्रिमंडळात प्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच राणेंचा हा सल्ला म्हणजे सरकारला नाकापेक्षा मोती जड असल्याचा इशारा असल्याचं बोललं जातं आहे. एका पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी हे वक्तव्य केलं.
आपल्या राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशामुळे शिवसेना घाबरली असून आपल्याला मंत्रिमंडळात घेऊ नये म्हणून शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे अट्टाहास चालविला आहे. परंतु, मी मंत्रिमंडळात असलो काय, नसलो काय, आपली ताकद कमी होणार नसल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची राज्यभर संघटनात्मक बांधणी सुरू आहे. येत्या दोन महिन्यांत पक्षाचे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, अशा पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जातील, असंही राणे यांनी सांगितलं.
कोकणातील नाणार प्रकल्पाला विरोध करणं हा शिवसेनेचा देखावा आहे. नाणार प्रकल्प झाला तर शिवसेना कोकणातून हद्दपार होईल, याची त्यांना भीती आहे. त्यामुळेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार, मंत्री यांच्यासह गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध होता तर मग उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी त्याला परवानग्या कशा दिल्या? असा सवालही त्यांनी केला. नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ९५ टक्के लोकांची पत्रं आपल्याकडे आहेत, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. पण, शिवसेना कसली पत्रं देणार, त्यांनी फक्त देखावा चालविला आहे, असंही ते म्हणाले.
हेही वाचा-
विधान भवनाबाहेर वृद्धेचा आत्महत्येचा प्रयत्न
आत्महत्यालय! मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन कैद्याची आत्महत्या