मुंबईच्या अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे तुकाराम काते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अध्यक्ष नवाब मलिक यांच्यात मुख्य लढत होणार आहे. हा मतदारसंघ मुंबईच्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात येतो.
एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात आता शिवसेनेचं वर्चस्व आहे. येथील विद्यामान खासदार राहुल शेवाळे आणि विद्यमान आमदार तुकाराम काते दोघेही शिवसेनेचेच आहेत. नवाब मलिक यांचा मूळ कुर्ला मतदारसंघ अनुसूचित जातींकरिता राखीव झाल्यानंतर ते या मतदारसंघात आले.
२००९ मध्ये नवाब मलिक यांनी तुकाराम काते यांना साधारणत: ६ हजार मतांनी पराभूत केलं होतं. परंतु या पराभवाची परतफेड करत २०१४ च्या निवडणुकीत काते यांनी मलिक यांचा अवघ्या १००७ मतांनी निसटता पराभव केला. शेकापच्या एका मुस्लिम उमेदवाराने ७ ते ८ हजार मते खाल्ल्याने हा पराभव मलिक यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. मलिक या पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
या मतदारसंघात एकाबाजूला बीपीसीएल, आयपीसीएल कर्मचारी वसाहत, रहेजा कॉम्प्लेक्ससारख्या उच्च मध्यमवर्गीयांच्या वसाहती असून दुसरीकडे मानखूर्द गाव, चिता कँपसारख्या झोपडपट्ट्या हे या मतदारसंघाचे वैशिष्ट्य. पराभवानंतरही हार न मानता मागील ५ वर्षांपासून मलिक यांनी मतदारसंघाशी चांगला संपर्क ठेवला आहे. तर काते यांचाही संपर्क दांडगा आहे. त्यामुळे इथली लढत चुरशीची होणार असल्याचा अंदाज आहे. त्याशिवाय मनसेचे विजय रावराणे देखील इथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.