वडाळा - मराठा क्रांती मूक मोर्चा संघटनेच्या वतीने 31 जानेवारीला मुंबईत मोर्चा काढला जाणार होता. मात्र या मोर्चावर निवडणुकीचे सावट असल्याने मराठा क्रांती मूक मोर्चा संघटनेच्या वतीने 15 जानेवारीला वडाळा पश्चिम येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या सभागृहात जिल्हा प्रतिनिधींची राज्यव्यापी बैठक घेण्यात आली होती. ही बैठक नेमका मुंबईत मोर्चा केव्हा काढण्यात यावा यासाठी आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीत 28 जिल्ह्यातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. 7 तास झालेल्या या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यांमधील प्रतिनिधींनी मोर्चाबाबत आपआपली मते मांडली. त्यात 28 पैकी 26 जिल्ह्यांनी 23 मार्च 2017 रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात यावा तसेच 31 जानेवारीला महाराष्ट्रात चक्का जाम करण्यात येईल असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मात्र लातूर आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्यांनी चक्का जामला एकमत दिले असले तरी 23 मार्च रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला विरोध दर्शवला असून हा मोर्चा 6 मार्चला काढण्यात यावा अशी मागणी केली असल्याने आजवर शिस्तबद्द पद्धतीने चाललेल्या मराठा क्रांती मूक मोर्चा संघटनेला गाल बोट लागणार का? अशी एकंदरीत परिस्थिती या बैठकीत निर्माण झाल्याने काहीवेळ गंभीर वातावरण निर्माण झाले होते. मात्र परिस्थिती नियंत्रणात आणत 26 जिल्ह्यातील प्रतिनिधींच्या बाजूनी निर्णय घेऊन 23 मार्चला मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चा संघटनेच्या वतीने मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येईल असं माथाडी कामगार संघटना नेते आमदार नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
तर 23 मार्च रोजीचा निर्णय मान्य नसलेले अखिल भारतीय छावा युवा संघटना अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील आणि सकल मराठा समाज प्रतिनिधींनी म्हटलं की, हा मोर्चा 6 मार्च रोजीच काढण्यात येईल. हा संघटनेच्या वतीने अखेरचा निर्णय आहे. दोन गटातील वेगवेगळ्या निर्णयामुळे नेमका मोर्चा केव्हा निघणार यावर सर्वच मराठा प्रतिनिधी संभ्रमात पडले असून एक प्रकारे निपक्ष असलेल्या या मराठा क्रांती मूक मोर्चा संघटनेस राजकीय मतांचे स्वरूप निर्माण झालं होतं.