फोर्ट - मराठा आरक्षणाबाबतची पुढील सुनावणी कधी हे येत्या 30 जानेवारीला निश्चित होणार आहे. महाराष्ट्र सरकारनं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
बुधवारच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. पोलिसांनी एक अतिरिक्त कुमक तसंच दंगलविरोधी पथक याठिकाणी तैनात केलं होतं. 80 टक्क्यांहून अधिक मराठा समाज मागासलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं प्रतिज्ञापत्र सरकारनं सादर केलं आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांमध्ये मराठा समाजातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचा दावाही सरकारनं केला आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या सुनावणी दरम्यान न्यायालयाने सरकारला उशिरा प्रतिज्ञापत्र सादर केल्याबद्दल फटकारलं. सरकारतर्फे 2700 पानी प्रतिज्ञापत्र 5 डिसेंबरला सादर झालं होते. येत्या 30 जानेवारीला या संदर्भात युक्तिवाद कधी सुरू होईल हे न्यायालयाकडून ठरवण्यात येईल. फेब्रुवारी महिन्यात हा युक्तीवाद सुरू होण्याची शक्यता आहे. या सुनावणी दरम्यान कोणतेही नेते मंडळी आम्ही आरक्षण देणार असं म्हणू शकत नाही, अशी सूचना न्यायालयानं या वेळी दिली. दरम्यान, आजच्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. पोलिसांनी एक अतिरिक्त कुमक तसेच दंगलविरोधी पथक या ठिकाणी तैनात केलं होतं.