मंबई - शेतकरी कर्जमाफीसाठी विधीमंडळात गदारोळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, काँग्रेसचे अब्दुल्ल सत्तार यांच्यासह अनेक आमदारांचा समावेश आहे. या सर्वांचं 31 डिसेंबरपर्यंत निलंबन करण्यात यावं, असा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी दिला. तो मान्य करण्यात आला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 18 मार्चला अर्थसंकल्प मांडत असताना, विरोधी पक्षांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गदारोळ घातला होता. टाळ वाजवत विरोधकांनी कर्जमाफीसाठी आग्रह धरला होता. अर्थसंकल्प झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विधानभवनाच्या बागेत अर्थसंकल्पांची होळी केली होती.
सभागृहात गोंधळ घालणे, बॅनर फडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, सभागृहाचे अवमान करणे असे आरोप ठेवून या आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. अर्थसंकल्प सादर करताना विरोधी पक्षांनी गोंधळ घातला होता, त्याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाही आणि शेतकऱ्यांची विरोधी पक्षांच्या आमदारांनी थट्टा केली आहे, अशी टीका केली होती. या सर्व कारणांमुळे या 19 आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.
निलंबित झालेले आमदार
भास्कर जाधव – राष्ट्रवादी काँग्रेस
जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी काँग्रेस
अमर काळे – काँग्रेस
दीपक चव्हाण – राष्ट्रवादी काँग्रेस
मधुसूदन केंद्रे – राष्ट्रवादी काँग्रेस
विजय वडेट्टीवार- काँग्रेस
संग्राम जगताप – राष्ट्रवादी काँग्रेस
हर्षवर्धन सकपाळ – काँग्रेस
अवधूत तटकरे – राष्ट्रवादी काँग्रेस
अब्दुल सत्तार – काँग्रेस
राहुल जगताप – राष्ट्रवादी काँग्रेस
दत्तात्रय भरणे – राष्ट्रवादी काँग्रेस
डी.पी. सावंत – काँग्रेस
नरहरी जिरवाळ – राष्ट्रवादी काँग्रेस
संग्राम थोपटे – काँग्रेस
अमित झनक – काँग्रेस
कुणाल पाटील – काँग्रेस
वैभव पिचड- राष्ट्रवादी काँग्रेस
जयकुमार गोरे – काँग्रेस