दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही फटाके विक्रीवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याची प्रतिक्रिया पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी देताच राज्यात फटाकेबंदी करायची की नाही? यावरून दिवाळीपूर्वीच राजकीय फटाके फुटायला लागलेत.
दिल्लीप्रमाणे राज्यातही फटाके बंदी व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्याशी बोलणार, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी देताच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला. त्यापाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील या वादात उडी घेत फटाकेबंदीला विरोध दर्शवला.
शिवसेना खा. संजय राऊत यांनी फाटकेबंदीला विरोध करत 'रोजगार देता येत नसेल तर, आहे तो रोजगार काढून घेण्यात कसला पुरुषार्थ'? असा टोला सरकारला हाणला. जगभरात १९९ देशात फटाके फोडले जातात. मग आपणच गरीबांच्या चुली का विझवत आहोत'? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
फटाक्यावर बंदी हा प्रदूषण रोखण्याचा उपाय नाही. गंगा प्रदूषण फटाक्यांमुळे झाले नाही. हजारो लोकांना रोजगार देणारा हा उद्योग आहे. असंख्य मराठी मुले फाटाक्यांचे स्टॉल लावून उदरनिर्वाह करतात.
- संजय राऊत, खासदार, शिवसेना
फटाकेबंदीच्या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेत हिंदू सणांवरच बंदी का?, असा सवाल उपस्थित केला. फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? अशी संतप्त प्रतिक्रिया देत यापूर्वी दिवाळी जशी साजरी करत होता, तशीच आताही करावी, असं आवाहन राज यांनी सर्वसामान्यांना केलं.
हेही वाचा -
दिल्लीपाठोपाठ राज्यातही फटाकेबंदी?
शिवसेना दिवाळीपूर्वीच फोडणार फटाका?