Advertisement

सत्तेच्या खेळावर राज ठाकरे कडाडले, उपस्थित केले अनेक प्रश्न

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या भूकंपाबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सत्तेच्या खेळावर राज ठाकरे कडाडले, उपस्थित केले अनेक प्रश्न
SHARES

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडाला वर्ष पूर्ण होत नाही तोच राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष देखील फुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजभवनात हा शपथ विधी सोहळा पार पडला आहे. सुरुवातीला अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता राज्याच्या राजकारणातून महत्त्वाच्या प्रतिक्रिया येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही या भूकंपाबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सत्तेच्या खेळावर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. "आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. राज्यातील किळसवाणं राजकारण जनता येत्या निवडणुकीत बंद पाडणार का?" असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्रात पुढे अजून काय पाहावं लागेल हा विचार करुन मन धस्स होत असल्याचंही ते म्हणाले.

आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना (Sharad Pawar) उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडल्याचं राज ठाकरे म्हणाले. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच, असा विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केला आहे.


तसंही सध्या शिंदेंना (Shinde Group) दिलं जाणारं (अवास्तव) महत्व महाराष्ट्र भाजपला (BJP) रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधल्याचं राज ठाकरे म्हणाले. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करुन मनात धस्स होतं, असंही राज ठाकरे म्हणाले.

बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार? असा महत्त्वाचा प्रश्न देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.



हेही वाचा

शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी निसटणार? अजित पवारांचा पक्षावर दावा

अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, 9 मंत्र्यांसह घेतली शपथ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा