“संजय राऊत हे एक नंबरचे फेकू आहेत. राज ठाकरेंनी त्यांना सामनात आणलं नसतं ते कुठंतरी कारकुनी करत असते,” असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी राऊतांवर टीका केली.
बुधवारी एका जाहीर कार्यक्रमात मुलाखत देताना संजय राऊत म्हणाले होते की, राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. ते शिवसेना सोडून गेले तेव्हा मी त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. परंतु राज समर्थकांना माझा राग आल्याने राज यांच्या घराखाली उभी असलेली माझी गाडी त्यांनी फोडली.
हेही वाचा- भविष्यात अशा गोष्टी खपवून घेणार नाही, थोरातांचा राऊतांना टोला
यासंदर्भात प्रतिक्रिया विचारल्यावर देशपांडे यांनी खुलासा केला की, संजय राऊत हे एक नंबरचे फेकू आहेत. राज ठाकरेंनी त्यांना सामनामध्ये आणलं नसतं, तर ते आज कुठंतरी कारकुनी करत असते. आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून राऊत यांना काही काम उरलेलं नाही. त्यामुळे वादग्रस्त वक्तव्ये करून ते चर्चेत राहात आहेत. ज्या मनसैनिकांनी त्यांची गाडी जाळली; त्यांचा आम्हाला अभिमानच आहे. या घटनेनंतर राज ठाकरेंकडून त्यांनी नवी कोरी गाडी घेतली होती, हे सांगायला मात्र ते विसरले.
हेही वाचा- तंगड्या तोडण्याची भाषा नको, तंगड्या प्रत्येकाला असतात, राऊतांनी उदयनराजेंना सुनावलं