कल्याण-शीळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. त्यातच लोकलसेवा बंद असल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात येणाऱ्या बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर व कल्याण-डोंबिवलीकरांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे योग्य खबरदारी घेऊन या शहरांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणमधील आमदार राजू पाटील यांनी केली आहे. (mns mla raju patil demands to start mumbai local train)
कल्याण-शीळ रस्त्याच्या कामासंबंधी नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार राजू पाटील एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी, ठाणे महापालिका आणि वन विभाग ठाणे इ. अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कल्याण फाटा येथील मुंब्रा - शीळ, रस्त्याचं रुंदीकरण, कल्याण फाटा इथं प्रस्तावित उड्डाणपूल, कल्याण फाटा येथील दत्त मंदिर जवळचं अतिक्रमण, गावदेवी मंदिराची पुन:र्बांधणी, दत्तमंदिराची पुन:र्बांधणी आणि शीळ - भिवंडी रस्त्याचं रुंदीकरण या विषयांवर चर्चा झाली. या चर्चेनंतर स्थानिकांच्या प्रवासाची होणारी अडचण लक्षात घेऊन राजू पाटील यांनी ही मागणी केली.
हेही वाचा - Raj Thackeray: जीम सुरू करा, बघू काय होतं ते- राज ठाकरे
#MMR_region मध्ये येणाऱ्या बदलापुर,अंबरनाथ,उल्हासनगर व कल्याण-डोंबिवलीकरांचे लोकल बंद असल्यामुळे प्रचंड हाल होत आहेत,त्यात कल्याण-शीळ रस्त्यावरची वाहतूककोंडी अजून भर टाकत आहे.योग्य खबरदारी घेऊन या शहरांसाठी लोकलसेवा चालू केल्यास दिलासा मिळेल.@OfficeofUT @drmmumbaicr
— Raju Patil (@rajupatilmanase) August 10, 2020
राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत लाॅकडाऊन शिथिल करत उद्योगधंदे, कार्यालये उघडण्यास परवानगी दिलेली आहे. शिवाय मुंबई महानगर परिसरात प्रवासाची मुभा देखील दिली आहे. परंतु मुंबईकरांच्या वाहतुकीचा अविभाज्य घटक असलेली उपनगरीय लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंदच असल्याने सर्वसामान्यांना आपल्या उद्योगधंद्यांच्या ठिकाणी पोहोचायला असंख्य अडचणी सहन कराव्या लागत आहेत. खासगी वाहन किंवा एसटी, बेस्ट बसमधून गर्दीतून प्रवास करताना सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.
सद्यस्थितीत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच मर्यादीत प्रमाणात चालवण्यात येणारी लोकल वाहतूक सेवा सर्वसामान्यांसाठीही चालू करण्यात यावी, अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे.
कोरोनाला घाबरून आता चालणार नाही. लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे लाॅकडाऊन काढून घ्यावं, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील सातत्याने करत आहेत.