ईव्हीएम (EVM)मुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. लोकशाही वाचली तरच देश वाचेल, त्यामुळे ईव्हीएम हटाव, देश बचाव, असा नारा देत इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम ( ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जनआंदोलन) या मोहिमेअंतर्गत नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन पुकारण्यात आलं होतं. या आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी मुंबईसहीत देशातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्येही हे महाअभियान राबवण्यात येणार आहे.
ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुकीत मतांची चोरी होत आहे. यामुळे लोकशाही धोक्यात येत आहे. त्यामुळे ईव्हीएम हटवून यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरनेच घेण्यात याव्यात, या मागणीसाठीहे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. आंदोलनाची ही सुरुवात असून मागणी पूर्ण होईपर्यंत हा लढा सुरुच राहणार असल्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. या आंदोलनात विविध राजकीय पक्ष, पुरोगामी, आणि विविध सामाजिक व सांस्कृतिक संघटनांचा समावेश होता.
याआधी पंतप्रधान नागपूरमध्ये येणार असल्याने पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. परंतु फोरमने याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली. या याचिकेत पंतप्रधान नागपूरमध्ये येऊन पुढच्या कार्यक्रमासाठी तत्काळ रवाना होणार आहेत. आंदोलनात सहभागी होणारी सर्वजण कायदा पाळणारे असून कुणावरही गुन्ह्याची नोंद नाही. त्यामुळे पोलिसांना या आंदोलनाला परवानगी देण्यात काहीच हरकत नाही, अशी भूमिका मांडण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने पोलिसांचा निर्णय रद्द करून आंदोलन कार्यक्रमाला परवानगी दिली.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसह येणाऱ्या सर्व निवडणुका ‘ईव्हीएम’ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणी करत जनजागृतीसाठी फोरमतर्फे दीक्षाभूमी ते चैत्यभूमी दरम्यान महाअभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाला सुरूवात करण्यात आली असून नागपूर पाठोपाठ वर्धा, अमरावती, अकोला, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, पुणे मार्गे मुंबईत दाखल होणाऱ्या या अभियानाचा समारोप दादरमधील शिवाजी पार्क इथं होणार आहे.
या अभियानादरम्यान मुंबईपर्यंत रथयात्रा आणि मार्गातील प्रत्येक शहरात पदयात्रा काढण्यात येणार आहेत. तसंच ठिकठिकाणी ईव्हीएमविरोधी जनजागृती सभा देखील घेण्यात येणार आहेत.
हेही वाचा-
निवडणुकीत फसवणूक होणार असेल तर मतदान कशासाठी? - राज ठाकरे
EVM विरोधात गळे काढण्याऐवजी आत्मचिंतन करा, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला