मुंबई महापालिका वगळता इतर महापालिकांतील चार सदस्यीय प्रभाग पद्धत रद्द होण्याच्या मार्गावर आहे. तसंच नगराध्यक्ष वा सरपंचाची थेट निवडही रद्द होण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून यासंदर्भातील विधेयक लवकरच विधीमंडळात सादर केलं जाईल.
भाजप सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१७ साली महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धत सुरू करण्यात आली होती. तर याचवेळेस नगराध्यक्ष आणि सरपंचांचीही थेट निवडणूक पद्धत सुरू झाली होती. या पद्धतीचा भाजपला फायदा झाला होता, कारण २०१७ सालच्या निवडणुकीत राज्यभरातील महापालिकांमध्ये भलेही भाजपला बहुमत मिळालं नसलं, तरी भाजपचेच सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले होते.
हेही वाचा- मोकाट जनावरांच्या मालकांना पालिका आकारणार 'इतका' दंड
त्यामुळे महाविकास आघाडीने पुन्हा एकदा निवडणुकीचा जुना फाॅम्युला सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागात एकच नगरसेवक आणि नगरसेवकांमधूनच नगराध्यक्षांची निवड होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून यासंदर्भातील विधेयक विधीमंडळात सादर करण्यात येईल.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अजित पवार यांना विचारलं असता, बहुसंख्य आमदारांनी पुन्हा निवडणुकीची जुनी पद्धत लागू करण्याची विनंती केली होती. ही पद्धत सर्वच पक्षांसाठी फायदेशीर असल्याने या प्रस्तावावर विचार करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा- साध्या लोकललाही स्वयंचलित दरवाजे, पश्चिम रेल्वेचा निर्णय