मुंबईतील केबलचालक राज ठाकरे (Raj Thackeray) यांना भेटण्यासाठी कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत. जिओ कंपनीच्या आक्रमक धोरणामुळं धंदा धोक्यात आल्यानं केबलचालकांनी भेट घेतली आहे. जिओ कंपनीकडून (Jio) विनापरवाना कनेक्शन देण्याचं काम सुरु आहे. त्यासाठी झाडे, रस्ते आणि वीजेच्या खांबांवरुनही केबल (cable) टाकल्या जात आहेत. जिओ कंपनीमुळे बाजारपेठेत निर्माण झालेल्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी इन मुंबई, हॅथवे, डीजे आणि सिटी केबल या कंपन्या एकत्र आल्या आहेत. मात्र, जिओच्या प्रचंड रेट्यामुळं इतर केबल चालकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे.
मागील अनेक दिवसांपासून अनेक संघटना राज ठाकरेंची भेट घेत आहेत. अशातच आता केबल चालकही आपलं गाऱ्हाणे घेऊन राज ठाकरे यांच्याकडे आले. त्यामुळं राज ठाकरे मुंबईतील केबलचालकांची कशाप्रकारे मदत करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी बेस्टच्या हंगामी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला होता. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्यात आले होते. हे कर्मचारी सोमवारी राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी कृष्णकुंजवर येणार आहेत.