माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची लवकरच घरवापसी होणार असल्याचे संकेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे. राणेंचं मन भाजपामध्ये रमत नसून ते भाजपामध्ये अवस्वथ असल्याचं म्हणत ते पुन्हा काँग्रेसमध्ये येणार असल्याचं म्हणत थोरातांनी राणेंच्या घरवापसीचे संकेत दिले आहेत. थोरातांच्या या संकेतानंतर राजकीय वर्तुळात आता राणेच्या घरवापसीवर चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
१९९९ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना राणेंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली होती. तर २००५ मध्ये राणेंनी शिवसेनेला राम राम ठोकला. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला खरा, पण पक्षश्रेष्ठींविरोधात जाहिर वक्तव्य केल्यानं त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. पण माफिनाम्यानंतर त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आलं. मात्र काँग्रेसमध्येही त्यांचं मन काही रमत नव्हतं, त्यामुळे २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली.
काँग्रेस सोडल्यानंतर राणे कोणत्या पक्षात जाणार हा प्रश्न होता. पण राणेंनी कोणत्याही पक्षात न जाता स्वतचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. त्यानंतर त्यांना भाजपाकडून राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. राज्यसभेची खासदारकी मिळाल्यानंतरही राणेंचं मन काही स्थिर नसल्याचं म्हटलं जात आहे. ते भाजपामध्ये अस्वस्थ अून त्यांना चुकल्या-चुकल्यासारखं वाटत असल्याचं म्हणत थोरात यांनी राणे लवकरच काँग्रेसमध्ये पुन्हा येतील असे संकेत दिले आहेत. दरम्यान राणे गेल्या काही दिवसांपासून इतर पर्याय शोधत होते. त्यासाठी ते अगदी शरद पवारांपासून इतर पक्षाच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते. तर सध्या राणे काँग्रेसच्या एका बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आता खरंच राणेंची घरवापसी होणार का याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा -
करिना कपूर निवडणुकीच्या रिंगणात?
संभाजी ब्रिगेडची 'ठाकरे'ला धमकी