महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण राणे हे निवडणूक लढणार नसल्याची माहिती मिळत आहे. दगा फटका होण्याच्या भीतीने नारायण राणे यांनी निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलूनच राणे निर्णय घेणार आहेत.
जर राणें विधान परिषद निवडणूक लढले तर त्यांचा पराभव करण्यासाठी विरोधक व्यूहरचना आखत असल्याचे बोलले जात आहे. राणेंचा मेरू रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना युती करण्याची शक्यता आहे. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये जाऊन बाहेर पडल्यानंतर राणे भाजपाच्या उंबरठ्यावरून मागे फिरले. त्यानंतर नारायण राणे यांनी स्वतःचा पक्ष काढला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यावर ते एनडीएमध्ये सहभागी झाले. यानंतर राणे यांची भाजपा मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी चर्चाही सुरू झाली.
राणेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी सात डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. सात तारखेलाच निकाल जाहीर होणार आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राणेंनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.
भाजपाने अपक्षांना सोबत घेऊन राणेंना पाठिंबा दिल्यास त्यांना 142 मते मिळतील. मात्र विरोधकांनी म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जोडीला शिवसेनेने मोट बांधली, तर त्यांचे संख्याबळ 146 वर जाईल. तसे झाल्यास विरोधकांचा उमेदवार विधानपरिषदेच्या आमदारपदी येईल.
पक्ष | संख्याबळ |
---|---|
भाजपा | 122 |
अपक्ष | 20 |
एकूण | 142 |
विरोधक | संख्याबळ |
---|---|
काँग्रेस | 42 |
राष्ट्रवादी | 41 |
शिवसेना | 63 |
एकूण | 146 |
हेही वाचा -
राणेंच्या रिक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी पोटनिवडणूक