'माजी मुख्यमंत्री नारायण राणे स्वतः आपल्या आमदार मुलाला पक्षात घेऊ शकत नाहीत, अशी त्यांची अवस्था झाली आहे,' अशा शब्दांत शरद पवारांनी नारायण राणेंची खिल्ली उडवली. तसेच, 'विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र येऊ शकतात आणि सध्या जनमत सरकारच्या विरोधात आहे. त्यामुळे कामाला लागा,' असे आदेशही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
नव्याने राजकीय पक्ष स्थापन केलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया विचारली असता पवारांनी नारायण राणेंची खिल्ली उडवली. 'नारायण राणे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांची काळजी घ्यायला हवी होती. आता निष्ठावान कार्यकर्ते सोडून गेले आहे. राणे यांचा पुत्र आमदार आहे. याशिवाय त्यांचे एक निष्ठावान सहकारी आमदार आहेत. मात्र ते त्यांना पक्षात घेऊ शकत नाहीत, अशी त्यांची अवस्था झालीये', असे पवार यावेळी म्हणाले.
शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवरही यावेळी टीका केली. राज्य सरकार सरसकट कर्जमाफी केल्याचे सांगत आहे. सरसकट कर्जमाफी करण्यात आली आहे, तर मग ही निकषाची भानगड कशाला ठेवली? असा प्रश्नही पवारांनी सरकारला विचारला. सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले असून त्याविरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. जनमत पूर्णपणे सरकारच्या विरोधात गेले आहे, असे पवारांनी यावेळी सांगितले. देशातील उद्योगधंदे बंद होत असून, बेरोजगारी वाढत आहे, असेही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सामान्य माणूस ज्यातून प्रवास करतो, त्याच्या यातना कमी करण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. पण बुलेट ट्रेनचे प्रोजेक्ट आणले जातात. जपानमध्ये आज आर्थिक मंदी आहे. सर्वात फास्ट ट्रेन ही जपानमध्ये आहे. फास्ट ट्रेनची कारखानदारी जपानमध्ये आहे, पण त्याला मार्केट नाही. जपानची आर्थिक मंदी कमी करण्यासाठी आपल्याकडे बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट सुरू आहे, असे म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली.
हेही वाचा -
राजकारणातून निवृत्ती? प्रश्नच उद्भवत नाही- शरद पवार