शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ त्वरीत मिळावा म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काही महिन्यांपूर्वी 'संघर्ष यात्रा' काढली होती. परंतु या 'संघर्षा'चा सत्ताधाऱ्यांवर म्हणावा तसा 'इम्पॅक्ट' पडला नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांकडून एक मातब्बर खेळाडू राजकीय आखाड्यात उतरवण्यात येत आहे. त्याचं नाव आहे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी कृषीमंत्री शरद पवार. विरोधकांडून मंगळवारी काढण्यात येणाऱ्या 'जनआक्रोश' मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी पवार तब्बल ३२ वर्षांनंतर रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करणार आहेत. पवारांची ही खेळी चर्चेचा विषय बनली असली, तरी विरोधकांकडे खासकरून राष्ट्रवादीकडे सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढणारा एकही ताकदीचा चेहरा नसल्याचंही यावरून प्रकर्षानं दिसून येत आहे.
शरद पवार यांनी यापूर्वी १९८५ साली जळगाव ते नागपूर येथे सायकल रॅली काढत त्यावेळच्या काँग्रेस सरकारला धारेवर धरलं होतं. तर आता ते भाजपा सरकाररोधात रस्त्यावर उतरून मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. यांत अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एवढी मोठी फळी असताना देखील पवारांना या वयात रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत आहे, ही पक्षासाठी नामुष्कीची बाब म्हणावी लागेल.
या मोर्चामध्ये शेकाप, समाजवादी पक्ष, रिपब्लिन पक्ष कवाडे गट देखील सहभागी होणार असून पवार यांच्यासोबत काँग्रेसचे माजी मंत्री गुलाब नबी आझाद देखील मोर्चाचं नेतृत्व संभाळतील.
शरद पवार यांचा मंगळवारी ७७ वा वाढदिवस आहे. राजकीय नेत्यांचा वाढदिवस म्हटला की पुष्पगुच्छ, कार्यकर्त्यांचा गोतावळा, केक कटिंग या गोष्टी आल्याच. पण पवार यंदा वाढदिवस 'सेलिब्रेट' करण्याऐवजी दिवशी रस्त्यावर उतरून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपुढे मांडणार आहेत.
दरवर्षी आम्ही पवार साहेबांचा वाढदिवस राहत्या घरी साजरा करतो. यावेळी विविध समाजपयोगी शिबिराचं देखील आयोजन केलं जातं. मात्र या असंवेदनशील सरकारला जागं करण्यासाठी आम्ही मोर्चाद्व्यारे विधान भवनावर धडकणार आहोत. सुमारे २ लाख मोर्चेकरी या मोर्चात सहभागी होतील.
- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री