महापालिकेत मागील अडीच दशकांपासून शिवसेना आणि भाजपा युतीची सत्ता आहे. परंतु झोपडपट्टी भागातील गल्लीबोळात अजूनही दिवा बत्तीची व्यवस्था देता आलेली नाही. त्यामुळे 'दो कानों के बीच में जो भेजा है उसका इस्तेमाल करो' अर्थात दोन कानांच्या मध्ये जो मेंदू आहे त्याचा उपयोग करावा, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदला खान यांनी सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केले. ‘भेजा’वरून केलेल्या या टिपण्णीवरून शिवसेनेच्या मेंदूला चांगल्याच झिणझिन्या आल्या आणि त्यांनी त्यांनी यावरून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे अखेर चांगला मुद्दा चर्चेविनाच गुंडाळला गेला.
मुंबईतील अनेक झोपडपट्टयांमध्ये दिवाबत्तीची सोय नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी महापालिका सभागृहात 66 (ब) अन्वये चर्चा उपस्थित केली होती. झोपड्यामधील गल्लीबोळात आजही वीजेचे दिवे नाही. त्यामुळे झोपड्यांमधील गल्लीबोळात अंधार पसरला जातो. यामुळे महिला आणि तरुण मुली यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. अंधाराचा फायदा घेऊन चोरी, मारामाऱ्या, लुटीचे प्रकार होत आहेत. झोपडपट्टी भागांमध्ये दिवाबत्तीची सुविधा देणे हे महापालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे. परंतु मागील अडीच दशकांपासून आली सत्ता असूनही झोपडपट्टयांमध्ये ही सुविधा पुरवण्यात येत नसल्याची टिका त्यांनी केली. यावरह महापौर गंभीर नसल्यामुळे सईदा खान संतप्त झाल्या आणि त्यांनी ‘दोन कान के बिचमें एक भेजा होता है, उसका तो उपयोग करो’ असे खडे बोल सुनावले. त्यावर शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाले आणि त्यांनी सईदा खान यांना शब्द मागे घेऊन माफी मागावी अशी मागणी केली.
शिवसेनेच्या नगरसेवकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात करताच सईदा खान यांनी शब्द मागे घेत असल्याचे सांगितले. परंतु यावरही गोंधळ सुरूच राहिला. शेवटी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सईदा खान यांना हा शब्द मागे घेण्याची सूचना केली. त्यानुसार शब्द मागे घेतला, परंतु आपण माफी मागणार नाही,असे त्यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेनेनेच नगरसेवक अजूनच आक्रम झाले आणि यावर अधिक चर्चा न करण्याची मागणी केली. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त संजय देश्मुख यांना निवेदन करायला लावत ही चर्चा कोणत्याही निष्कर्ष आणि निर्णयाविना गुंडाळली.