शिवसेना आणि भाजपामध्ये सत्तासंघर्ष सुरू असताना आम्ही विरोधी पक्षात बसणार असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर जयंत पाटील म्हणाले की, जनतेनं आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला असल्याने आम्ही विरोधी पक्षाचीच भूमिका बजावणार आहोत.
गटनेतेपदाच्या नियुक्तीबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार विरोधी पक्ष नेत्याबाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल. राष्ट्रवादी अंतर्गत कसलीही स्पर्धा नाही. शरद पवार सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेत असतात. दुसरीकडे आमदार नवाब मलिक यांनी, विधीमंडळात विश्वासदर्शक ठरावानंतर भाजपाचे सरकार कोसळले तर राष्ट्रवादी पर्यायी सरकारचा विचार करेल असं म्हटलं आहे. त्यांचं हे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.
विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये सत्ता संघर्ष चांगलाच रंगला आहे. या पार्श्वभूमिवर विधीमंडळात विश्वासदर्शक ठरावावेळी शिवसेनेने भाजपाविरोधी भूमिका घेतली आणि सरकार पडले तर राष्ट्रवादी पर्याय सरकारचा विचार नक्कीच करेल, असं मलिक यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -
महायुती, आघाडीच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची आज निवड