महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका करत भाजपविरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं. तसंच, 'देश एकंदरीत धोक्यात आहे, आणि ही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली म्हणून नाही, तर मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेर ठेवण्याच्या दृष्टीने पाहतो', अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेचं राष्ट्रवादी पक्षाकडून स्वागत करण्यात आलं आहे. त्याशिवाय राज ठाकरेंना राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक मानत असल्याचं मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे.
'आमच्या पक्षाचे नेते शरद पवार यांची स्तुती देशातील अनेक नेत्यांनी केली. त्यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी अशी भूमिका मांडली आहे, की सर्व विरोधी पक्षीयांनी एका व्यासपीठावर यावं. तांत्रिक दृष्टिकोनातून जरी आम्ही एकत्रित येऊ शकलो नसलो तरी स्वतः राज ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण किंवा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सर्वच आमचे स्टार प्रचारक आहेत' असं मानत असल्याचं, सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.
देश धोक्यात असताना ही निवडणूक भाजपाच्या विरोधातली म्हणून नाही तर मोदींच्या सरकारला बाहेर ठेवण्यासाठी आहे, या सन्माननीय राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. आदरणीय पवारसाहेबांची स्तुती देशातील अनेक नेत्यांनी केली आहे. (1/2) pic.twitter.com/C1k1fZZUuf
— Sachin Ahir (@AhirsachinAhir) March 19, 2019
'नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही दोन माणसं देशाच्या राजकीय पटलावरुन बाजूला होणं गरजेचं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे उतरणार नसली, तरी मोदी आणि शाहा यांच्याविरोधात सभा घेणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली. त्याशिवाय, मोदींच्या विरोधातल्या प्रचाराचा फायदा ज्यांना होतोय त्यांना होऊ द्या, तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा, असे आदेश राज ठाकरेंनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले.
आगामी लोकसभा निवडणूक ही मोदी-शाह विरुद्ध देश असेल. तसंच, यापुढे मी ज्या सभा घेईन, त्या नरेंद्र मोदी-अमित शाह यांच्याविरोधातल्या असतील. आपली लढाई ही कोणत्याही विशिष्ट पक्षाशी नाही, तर मोदी आणि अमित शाह याच्याविरोधात आहे. त्यांच्या उमेदवारांना मतदान न करणं आणि त्यांना मदत न करणं हाच उद्देश आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह नकोत, म्हणून भाजपला मतदान करु नका', असे आवाहन सुद्धा राज ठाकरेंनी केलं आहे.
हेही वाचा -
विद्यापीठाच्या ७६ परीक्षेच्या तारखेत तर २७ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल
पगार वेळेत न मिळत असल्यामुळे बेस्ट कामगार साधणार मुंबईकरांशी संवाद