राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते गणेश नाईक बुधवारी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. तर आता राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव शिवसेनेत दाखल होणार आहेत. हे दोन मातब्बर नेते पक्ष सोडणार असल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. भास्कर जाधव १३ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ कोकणातूनही पक्षाला गळती लागली आहे. आमदार अवधूत तटकरे यांनी आमदारीचा राजीनामा दिला असून ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आता त्याआधीच भास्कर जाधव शिवबंधन हाती बांधणार आहेत. ते शिवसेनेत जाणार याची चर्चा होती. भास्कर जाधव यांनीच आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित ते १३ सप्टेंबर रोजी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
भास्कर जाधव यांच्या सेना प्रवेशाने कोकणात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. याबाबत भास्कर जाधव म्हणाले की, मी माझं म्हणणं शरद पवार साहेबांकडं लिखित स्वरूपात दिलं आहे. त्यांच्याशी बोलल्यानंतर मी पक्ष सोडला आहे. ९ जिल्हा परिषद सदस्य, गुहागर पंचायत समिती आणि ७३ सरपंच माझ्याबरोबर आहेत.
जाधव यांनी ऑगस्ट अखेरीस उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी पक्षातून मिळत असलेल्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली होती. शरद पवार यांनी पुष्कळ दिले. पण, पक्षांतर्गत लाथाळ्यांनी त्रस्त आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं होतं.
हेही वाचा -
गणेश नाईकांचा भाजपप्रवेश ठरला, महापालिकेतील सत्ताही करणार हवाली