राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. क्षीरसागर यांच्या शिवसेना प्रवेशानं बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे.
जयदत्त क्षीरसागर हे बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकमेव आमदार होते. बीड नगर पालिका निवडणुकीपासून जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादीकडून बळ देण्यात येत असल्याने जयदत्त क्षीरसागर यांची घुसमट सुरू होती. येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला डावलून पुतण्याला तिकीट दिलं जाईल, याची भीती त्यांना सतावत होती. त्यामुळेच लोकसभेचा निकाल लागल्यापूर्वीच त्यांनी सेना प्रवेश निश्चित केल्याचं म्हटलं जात आहे.
क्षीरसागर यांच्या सेनाप्रवेशानंतर उद्धव ठाकरे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, 'एक्झिट पोल आणि क्षीरसागर यांच्या सेना प्रवेशाचा संबंध नाही. क्षीरसागर, शिवसेनेत येण्याचा आपल्याला कधीही पश्चाताप होणार नाही. बीड जिल्हा मजबूत करण्याची तिथं शिवसेना वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे.'
क्षीरसागर आपल्या पक्षप्रवेशाबद्दल म्हणाले, 'एक्झिट पोलमुळे मी हा निर्णय घेतलेला नाही. माझा निर्णय खूप आधीच झाला होता. ज्या पक्षाच्या स्थापनेचा मी साक्षीदार आहे, जो पक्ष मी ताकदीनं वाढवला. बीड जिल्ह्यात ६-६ आमदार दिले, त्याच पक्षातील सापत्न वागणुकीमुळे माझ्या कार्यकर्त्यांची घुसमट होत गेली. म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला.'
यावेळी खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते.
हेही वाचा-
मनोज कोटक होणार मुंबई भाजपा अध्यक्ष?
'स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्रांची सुरक्षा वाढवा'- मिलिंंद देवरा