मुंबई - मनोहर पर्रिकर संरक्षणमंत्री पदाचा राजीनामा देऊन गोव्यात मुख्यमंत्री पदावर आरूढ झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना संरक्षण मंत्रालय दिले जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील मंत्र्यांमध्ये बदल होणार नसल्याचे सांगितले.
संरक्षणमंत्री कोण असेल हे पंतप्रधान ठरवतील अशी माहिती यावेळी नितीन गडकरी यांनी दिली. काही चॅनलवाल्यांना 24 तास काम करायचं आहे म्हणून अशा प्रकारच्या बातम्या तयार केल्या जातात असं त्यांनी यावेळी सांगितले. तसेच गोव्यातील राजकीय घडामोडींबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की गोवा विधानसभेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. 23 लोकांचं समर्थन आम्हाला मिळालं आहे. त्यामुळे बहुमत सिद्ध झालं आहे. आमच्यावर आरोप केले होते पण ते निराधार होते हे सिद्ध झालं आहे. असंही ते यावेळी म्हणाले. तसेच जी काँग्रेस पार्टी स्वतः चा नेता ठरवू शकत नाही त्यांनी आमच्यावर आरोप करू नयेत, असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला.