कुंभारवाडा - प्रभाग क्रमांक 220 मध्ये शिवसेनेचे उमेदवार सुरेंद्र बागलकर आणि भाजपाचे उमेदवार अतुल शहा यांच्यात अटीतटीचा सामना रंगला. शेवटी दोघांमध्ये टाय झाल्याने चिठ्ठी काढून विजयी उमेदवार निवडण्यात आला. मात्र आता ही लॉटरी पद्धतच वादात सापडण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे उमेदवार सुरेंद्र बागलकर आणि भाजपाचे उमेदवार अतुल शहा यांना 5 हजार 946 अशी सम समान मते मिळाली. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त अजोय मेहेता यांनी चिठ्ठी काढून निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला. यात अतुल शहा विजयी झाले. पण हा निर्णय सुरेंद्र बागलकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अमान्य होता. यावर आक्षेप घेत निकालाच्या कागदपत्रांवर सह्या करण्यास बागलकरांनी नकार दिला. मतदानाच्या दिवशी या प्रभागात पाच टेंडर व्होट करण्यात आले होते. त्या आधारे निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेने केली असून शिवसैनिक या मागणीसाठी न्यायालयात धाव घेणार आहेत.
प्रभाग क्रमांक 220 चा लोकप्रतिनिधी एका चिठ्ठीद्वारे निवडला जातो हे कितपत योग्य आहे. जर चिठ्ठीद्वारे लोकप्रतिनीधीची निवड करायची असेल तर मतदानाचा दिखावा का करता? त्यापेक्षा मतदान घेऊच नये. ही आमची फसवूणक आहे. यासाठी आम्ही न्यायालयात धाव घेऊन पाच टेंडर व्होट ओपन करा अशी मागणी करणार आहोत.
- वैभव मयेकर, शाखाप्रमुख
एखादी चिठ्ठी लोकप्रतिनीधीचे भविष्य कसे ठरवू शकते. पाच टेंडर व्होट जाहीर करावे अन्यथा मतदान परत घ्यावे. लोकशाहीत नागरिकांचे घेतलेले मत वाया जाऊ नये म्हणून टेंडर व्होट घेतली जातात. मग हे टेंडर व्होट न्यायालयाने जाहीर करावी.
- सुरेंद्र बागलकर