राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यानंतर भाजपनं अखेर सरकार स्थापन केलं. भाजपच्या या खेळीच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सोमवारी होण्याची शक्यता होती. पण या याचिकेवर तात्काळ म्हणजेच शनिवारीच सुनावणी व्हावी, अशी मागणी शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं केली आहे.
तिन्ही पक्षांकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये रीट याचिका दाखल केली आहे. सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया ही बेकायदेशीर आहे. राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट मागे घेणे आणि फडणवीस यांचा शपथविधी घेण्याच्या निर्णयाविरोधात ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये महाविकासआघाडीकडे पूर्ण बहुमत आहे, त्यासाठी राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण द्यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी या याचिकेबद्दल साशंकता निर्माण केली आहे. सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल जरी झाली तरी त्यावर तातडीनं सुनावणी होणार नाही. जरी सुनावणी झाली तरी निर्णय यायला उशीर होईल, असा दावा अणेंनी केला आहे.
हेही वाचा