Advertisement

मुंबईतल्या कोरोना आकड्यांतील बनवाबनवी ताबडतोब थांबवा- देवेंद्र फडणवीस

कोरोना आकड्यांतील ही बनवाबनवी ताबडतोब थांबवा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी केली आहे.

मुंबईतल्या कोरोना आकड्यांतील बनवाबनवी ताबडतोब थांबवा- देवेंद्र फडणवीस
SHARES

मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उजेडात येऊ न देणं, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभं करणं आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास आणता लढ्यात बाधा उत्पन्न करण्याचे प्रकार सुरू आहेत. कोरोना आकड्यांतील ही बनवाबनवी ताबडतोब थांबवा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस (devendra fadnavis) यांनी केली आहे.

यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी नमूद केलं आहे की, मुंबईतील कोरोना हा प्रशासकीय उपायांमुळे नियंत्रणात आणण्यात आला आहे, असं आभासी चित्र निर्माण केलं जातं. याबाबत वारंवार अनेक बाबी मी आपल्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. दुर्दैवाने प्रत्येकवेळी असं आभासी चित्र उभं करण्यासाठी अशा कठीण समयीसुद्धा पीआर कंपन्या आणि सेलिब्रेटींचा वापर केला जातो. हे खरोखरच दुर्दैवी आहे.

मृत्यू नोंदी चुकीच्या

कोविड संदर्भातील नोंदी ठेवण्याबाबत जागतिक पातळीवर जागतिक आरोग्य संघटना आणि भारताच्या बाबतीत आयसीएमआर यांनी निश्चित अशी नियमावली आखून दिली आहे. या नियमावलीप्रमाणे कोविडच्या कारणामुळे होणारा प्रत्येक मृत्यू हा कोविडचाच मृत्यू म्हणून नोंदवायचा आहे. फक्त त्याला अपवाद अपघात, आत्महत्या, खून या कारणामुळे झालेले मृत्यू किंवा काही विशिष्ट बाबतीत एखाद्या ब्रेनडेड रुग्णाचा अथवा चौथ्या टप्प्यातील एखाद्या कर्करोगाच्या रुग्ण यांचा आहे. केवळ असेच मृत्यू हे अन्य कारणामुळे झालेले मृत्यू या रकान्यात नोंदवायचे आहेत.

मुंबईतील मृत्यूदर अथवा सीएफआर कमी दाखवण्यासाठी नेमका किती भयंकर प्रकार होतो आहे, हे स्पष्टपणे दिसून येतं. उर्वरीत महाराष्ट्रात एकीकडे अन्य कारणांमुळे होणारे मृत्यू नोंदवण्याचं प्रमाण ०.७ टक्के असताना मुंबईत मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान हे प्रमाण ३९.४ टक्के इतकं आहे. पहिल्या लाटेतसुद्धा हे प्रमाण उर्वरीत महाराष्ट्रात ०.८ टक्के, तर मुंबईत १२ टक्के होतं.

हेही वाचा- पुरेशी लस मिळण्याची शक्यता कमी, ‘या’ प्रकारे कोरोनाची तिसरी लाट थोपवावी लागेल- मुख्यमंत्री

कमी चाचण्या

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मुंबईतील संसर्ग दर कमी व्हावा, यासाठी कमी चाचण्या करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेच्या (bmc) वतीने सातत्याने होत आहे. मुंबईसारख्या शहरात जिथं आरटीपीसीआर चाचण्यांची क्षमता १ लाख इतकी आहे तिथं केवळ सरासरी ३४, ९१९ इतक्याच चाचण्यात प्रतिदिन केल्या जात आहेत. (गेल्या १० दिवसांतील सरासरी) आणि ३० टक्के या रॅपीड अँटिजेन प्रकारातील आहेत.

हे मान्य आहे की, आयसीएमआरने ३० टक्के रॅपीड अँटिजेन चाचण्या मान्य केल्या आहेत, पण त्या जिथं की आरटीपीसीआर चाचण्यांची पूर्ण क्षमता नाही, अशा ठिकाणी. जिथं आरटीपीसीआरची पूर्ण क्षमता आहे, तिथं हे प्रमाण १० टक्क्यांच्या वर असता कामा नये. रँपीड अँटिजेन चाचण्यांची कार्यक्षमता ही ५० टक्क्यांहून कमी असल्याने चाचण्यांच्या संख्येत तर भर पडतेच पण संसर्ग दर हा कृत्रिमपणे कमी होत जातो.

कमी चाचण्यांमुळे संसर्गाचे प्रमाण तर वाढतेच, शिवाय मृत्यूदरही वाढतो. परंतू अशापद्धतीने बनवाबनवी केली जात असल्याने करोनाचे वास्तविक चित्र जनतेपुढं येत नाही. याशिवाय, अन्य कारणामुळे होणारे मृत्यू असे दाखवून त्यांचे कोविड प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार न केल्यास त्यातून अकल्पित अशा असंख्य संकटांना वेगळंच तोंड द्यावं लागेल.

पीआरमार्फत दिशाभूल

मुंबईतील (mumbaiप्रशासन आणि अधिकारी कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी करत असलेले प्रयत्न मला अजीबात कमी लेखायचे नाहीत. किंबहूना त्याची मी नोंद घेत आहे. मुंबईतील करोना संसर्गाचा आलेख स्थिरावतोय, (प्लाटू होतो आहे) ही आपल्यासाठी समाधानाची बाब आहे. परंतू, आयआयटी कानपूरचे प्रो. मणिंदर अग्रवाल यांनी सांख्यिकी अभ्यासाच्या आधारावर यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे, मुंबईत कोरोना संसर्गाचे (coronavirus) शिखर (पिकिंग) उर्वरित देशाच्या तुलनेत आधीच म्हणजे एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यातच गाठले व त्याच मॉडेलप्रमाणे आता तो स्थिरावताना दिसतो आहे आणि यानंतर तो कमी होईल, अशी अपेक्षा आहे. 

मुंबईमध्ये घडले त्याप्रमाणेच पुणे तथा नागपूर याही ठिकाणी प्लाटुईंगची स्थिती दिसून येत आहे. (अर्थात नागपूर या सरकारच्या नजरेतून दूर असताना देखील तिथंही हे घडत आहे) आता आपण म्हणतोय की, आपण तिसर्‍या लाटेसाठी सज्ज होतोय, तर अशावेळी पीआर संस्थांमार्फत जे चित्र जनतेपुढे निर्माण केलं जातंय, ते पूर्णत: दिशाभूल करणारं आणि करोनाविरोधातील राज्य सरकारच्या संघर्षाला कमकुवत करणारे आहे. 

ही बनवाबनवी आणि पीआर यंत्रणांमार्फत समाजाची, राज्यातील जनतेची केली जाणारी दिशाभूल तत्काळ बंद करण्याचे आदेश आपण द्यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा