केंद्र व राज्य सरकारच्या मागील चार वर्षांच्या कारभारावर जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. भाजपलाही त्याची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे थेट जनतेशी संपर्क साधून त्यांचं समर्थन मागण्याची हिंमत भाजपकडं नाही. त्यामुळं त्यांच्यावर सेलिब्रेटींकडे जाऊन ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान राबवण्याची वेळ ओढवली, अशी बोचरी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील यांनी दोन्ही पक्षांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, भाजपने समर्थन मागण्यासाठी सेलिब्रिटींऐवजी सर्वसामान्य जनतेकडं जायला हवं होतं. गेल्या १ जूनपासून संपूर्ण देशात शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. भाजपला समर्थन मागायचंच होतं तर संपकरी शेतकरी, पेट्रोल-डिझेलच्या महागाईने होरपळून निघालेला ग्राहक, एसटीच्या १८ टक्के भाडेवाढीचा फटका बसलेला प्रवाशी, नोकरीसाठी दाहीदिशा फिरणारे तरूण, नोटबंदी, जीएसटीने व्यवसाय ठप्प झालेले व्यापारी अन् उद्योजकांकडे जाऊन समर्थन मागायला हवं होतं. पण भाजपकडे तेवढी हिंमत राहिलेली नसून, विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना भेटून अन् त्यांचं समर्थन मागून देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याचं विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.
मागील चार वर्ष विरोधी पक्षांनी संपूर्ण देशात भाजप व शिवसेना सरकारविरूद्ध रान पेटवलं आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना धडकी भरली असून, चार वर्ष एकमेकांवर प्रचंड टीका केल्यानंतर एकत्र येण्यासाठी केविलवाणी धडपड करतात, हा विरोधी पक्षांचा मोठा विजय आहे. सरकारच्या मनात विरोधी पक्षांबद्दल धास्ती असल्यामुळंच अमित शहांच्या दौऱ्यात काँग्रेसनं आंदोलन करू नये म्हणून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना सकाळपासून नजरकैदेत ठेवण्यात आलं.
भाजपने मागील चार वर्ष देशाची सतत दिशाभूलच केली आहे. शिवसेनेनंही त्यावर वारंवार अत्यंत कठोर भाषेत टीका केली. भाजपने केलेल्या देशाच्या फसवणुकीसाठी शिवसेनेने अमित शहा यांना झणझणीत वडापावचा ठसका द्यायला हवा होता. पण त्याऐवजी त्यांनी ढोकळा, खांडवी अन् गाठिया हाती घेऊन भाजप नेत्यांच्या स्वागताला उभं रहावं, हा महाराष्ट्राचा मोठा अवमान असून, तो शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी व्हावा, हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. या अवमानानंतर शिवसेनेला भाजपवर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही, असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.
हेही वाचा-
शिवसेना स्वबळावर ठाम - खा. संजय राऊत
शेतकऱ्यांसाठी विशेष अधिवेशन घ्या - खा. राजू शेट्टी