महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी एकनिष्ठ असल्याचं छाती ठोकून सांगणाऱ्या मनसेचे महापालिका गटनेते दिलीप लांडे, अश्विनी अशोक माटेकर, दत्ता नरवणकर तसेच अर्चना संजय भालेराव या ६ नगरसेवकांनी एक स्वतंत्र गट करून मनसेला 'राम राम' करत शिवसेनेत प्रवेश केला.त्यामुळे मनसेकडे आता कुर्ला येथील प्रभाग १६६ चे नगरसेवक संजय तुर्डे हे एकमेव नगरसेवक उरले आहेत.
महापालिका निवडणूक मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी तुर्डे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. तरी कोणालाही न घाबरता आपले कार्य पुढे चालू ठेवणाऱ्या या नगरसेवकाने आपल्या एकनिष्ठतेची पोचपावतीच दिली आहे. सत्तेच्या घोडेबाजारात सामील न होणारे तुर्डे येत्या काळात मनसेचा खरा 'कोहिनूर हिरा' म्हणून ओळखले जातील, असं म्हटलं जात आहे.
१) दिलीप (मामा) लांडे: मुंबई महापालिकेत मनसेचे गटनेते असलेले दिलीप लांडे प्रथम १९९७ ते २००२ आणि त्यानंतर मार्च २०१२ ते आतापर्यंत तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून आले आहेत. तर २००२ ते २०१२ या काळात त्यांच्या पत्नी शैला लांडे या दोनदा निवडून आल्या आहेत. त्यामुळे १९९७ पासून सलग लांडे घराण्याचा नगरसेवक कुर्ला विभागात आहे.
२) अश्विनी माटेकर: मनसेचे कुर्ला-पवईतील मनसेचे विभागप्रमुख अशोक माटेकर यांच्या पत्नी अश्विनी माटेकर या प्रथमच नगरसेवक म्हणून आल्या.
३) दत्ता नरवणकर: वरळीतील मनसेचा एकनिष्ठ शाखाप्रमुख म्हणून ओळख असलेल्या दत्ता नरवणकर हे वरळीतील प्रभाग क्रमांक १९७ मधून निवडून आले.
४) हर्षला मोरे: एकेकाळी राष्ट्रवादीचे सक्रीय कार्यकर्ते आशिष मोरे यांच्या पत्नी हर्षिला मोरे या धारावीतील प्रभाग क्रमांक १८९ मधून मनसेच्या तिकीटावर निवडून आल्या.
५) डॉ. अर्चना भालेराव: मनसेचे माजी नगरसेवक संजय भालेराव यांचा प्रभाग महिला आरक्षित झाल्यामुळे त्यांनी घाटकोपर पश्चिम येथील श्रेयस सिनेमा परिसरातील प्रभाग क्रमांक १२६ मधून आपली पत्नी डॉ. अर्चना भालेराव यांना निवडून आणले.
६) परमेश्वर कदम: घाटकोपर पूर्व येथील माता रमाबाई नगरमधील प्रभाग क्रमांक १३३ मधून मनसेचे नगरसेवक परमेश्वर कदम हे पुन्हा निवडून आले आहेत.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)