मराठा आरक्षण आंदोलनात (maratha reservation) काही राजकीय लोक घुसले असून त्यांना मराठा आणि ओबीसी समाजात आरक्षणावरून भांडण लावायचं आहे, असा गंभीर आरोप मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यावरच राज्य सरकारचा भर आहे. मागील सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतला होता, त्याच भूमिकेतून राज्य सरकार कार्यवाही करत आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण (obc reservation) देण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही तरीही काहीजण गैरसमज पसरवत आहेत. मराठा आणि ओबीसींमध्ये वाद लावून राजकीय फायदा उचलण्यासाठी हे षडयंत्र रचलं जात आहे, असा आरोप अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी केला.
हेही वाचा - मराठा आरक्षण: घटनापीठ स्थापन करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र सरकारकडून तिसऱ्यांदा अर्ज
या आंदोलनांमध्ये कोणत्या पक्षाचे लोकं आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. आंदोलन करणं हा तुमचा अधिकार आहे, पण आंदोलन तुम्ही कोणाविरुद्ध करत आहात हा मूळ प्रश्न आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही, असे आरोप वारंवार केले जात आहेत, ते चुकीचे आहेत. मराठा आरक्षणाच्या लढ्यात राज्य सरकारने मुकूल रोहतगी, अॅड. पटवालिया, कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी असे देशातील नामवंत वकील उतरवले आहेत. सरकारकडे चांगले वकील नाहीत, असं ज्यांना वाटतं, त्यांनी आंदोलन करण्याऐवजी न्यायालयात येऊन भक्कमपणे बाजू मांडावी. मराठा समाजातील निष्णांत वकील द्यावेत, असं आवाहनही अशोक चव्हाण यांनी केलं.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने कायदेशीर प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. त्यातच कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे अत्यंत कमी शैक्षणिक कालावधी उरलेला आहे. या कालावधीचा उपयोग करून विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून राज्य सरकारकडून तोडगा काढण्यात येत आहे, असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं. (politics over obc and maratha reservation says ashok chavan)