Advertisement

गौरी लंकेश आणि आपण!


गौरी लंकेश आणि आपण!
SHARES

पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनावरून उभ्या देशात दोन गट पडले आहेत. एक गट खुनाचं समर्थन करतो आहे, तर दुसरा गट तेवढ्याच टोकाचा निषेध! खून, मग तो कुणाचाही असो, तो निषेधार्हच असतो. कुणाच्याच खुनाचं समर्थन करता येत नाही.



गौरी लंकेश यांच्या खुनाचं समर्थन वा निषेध करणाऱ्यांना गौरी लंकेश व त्यांच्या विचारांबद्दल किती माहिती आहे, हे कळण्यास काही मार्ग नाही. किंबहुना, ती असण्याची शक्यताही अगदी कमी आहे. परंतु, सोशल मीडिया असो किंवा टीव्हीसारखा इलेक्ट्राॅनिक मीडिया असो, यांची सहज उपलब्धता झाल्याने, जो तो तज्ज्ञ वा न्यायाधीश बनून या खुनावर किंवा कोणत्याही घटनेवर आपापली मतं मांडताना दिसत आहे. मीडियाने तर या विषयावर न बोलणंच (खरं तर आपण न पहाणं) चांगलं. 'ब्रेकिंग न्यूज'ला खरं म्हणजे 'बार्किंग न्यूज' हे नाव जास्त समर्पक आहे, असं मला आताशा वाटू लागलंय.



आपापली मतं मांडताना ती पक्षपाती नाहीत, याची काहीच खात्री देता येत नाही. कुणी जर म्हणत असेल, की त्याचं मतं अगदी नि:पक्षपाती आहे, तर ते खोटं असतं असं खुशाल समजावं. कारण, आपण आपली म्हणून जी मतं मांडतो, त्यावर, आपली स्वत:ची जी पूर्वापार समजूत असते, त्या समजुतीचा प्रभाव अपरिहार्यपणे पडलेलाच असतो. आणि, असं असेल तर ते मत नि:पक्षपाती आहे असं खचितच म्हणता येत नाही. उदा. हिंदुत्ववादी लोक गौरी लंकेश यांच्या खुनाचं छुपं/उघड समर्थन करताना दिसतात. तर, अ-हिंदुत्ववादी लोक, गौरी लंकेशांचा जो काही पूर्वेतिहास किंवा त्यांची मतं विसरून खुनाचा निषेध करताना दिसतात. म्हणजे, समर्थन किंवा निषेध करताना आपापल्या पूर्वग्रहानुसार आणि आपल्या मतांच्या सोयीने केलं जातं असंच चित्र दिसतं.

'पेड न्यूज'च्या जमान्यात पत्रकार समतोल विचार करून आपापल्या माध्यमात बातमी वा लेखांची मांडणी करतात, हे आपण छातीवर हात ठेवून सांगू शकतो का? पत्रकार आणि मीडियाच्या लोकांची मतंच पेपर/टीव्हीच्या माध्यमातून वाचक/प्रेक्षकांच्यावर लादली जातात, हे आपण रोज अनुभवतो. पत्रकारांनी तरी स्वत:ची मतं बाजूला ठेवून बातमी किंवा माहिती द्यावी अशी अपेक्षा असते. या अपेक्षेला किती पत्रकार खरे उतरतात, याचाही विचार प्रत्येकाने करायला हवा. 'गोबेल्स नीती' सरकारच नव्हे, तर विरोधी पक्ष किंवा अगदी आपणही रोजच्या रोज राबवत नसतो का? आपलीच मतं कशी बरोबर आणि दुसऱ्याची चूक, हे आपणही प्रसंगानुरुप वेळोवेळी लोकांना सांगत असतोच की..!

गौरी लंकेश यांच्याविषयी मलाही फारशी माहिती नाही. किंबहुना, माझं नियमित पेपर वाचन असूनही हे नाव माझ्या नजरेखालून कधीही गेलं नव्हतं, हे मी पहिल्यांदाच सांगून टाकतो. तरीदेखील, गेल्या दोन दिवसांत गौरी लंकेशांसंबंधात ज्या काही बातम्या वा माहिती मी समाज माध्यमं किंवा इंटरनेटवरून घेतली त्यावरून, गौरी लंकेश नक्षलवादी चळवळींशी संबंधीत होत्या, असा निष्कर्ष काढावा लागतो. गौरी लंकेशांच्या बंधूंची एक प्रतिक्रिया नुकतीच इंडिया टीव्हीवर पाहिली. त्यात, त्यांनी गौरी लंकेशांचा खून नक्षलवाद्यांच्या आपापसातल्या भांडणातून झाला असण्याची शक्यता वर्तवली. गेल्या काही वर्षांत प्रत्यक्ष फिल्डवर कार्यरत असणारे नक्षलवादी आणि शहरांत त्यांचे असलेले उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित समर्थक यांच्यामधली दरी वाढत असल्याच्याही बातम्या मला वाचायला मिळाल्या. गौरी लंकेशांच्या खुनामागे ही शक्यता आहे का, हेही तपासून पाहायला हवं, ते काम तपास यंत्रणा करतीलच.



दुसरं म्हणजे, जेएनयूमध्ये कन्हैयाकुमार प्रकरणात 'भारत तेरे टुकडे होंगे' या घोषणा देणारा उमर खालीद आणि स्वत: कन्हैया कुमार यांचं मातृत्व गौरी लंकेश यांनी जाहीररीत्या स्वीकारलं होतं. भारताचे टुकडे करायची इच्छा असणाऱ्यांना गौरी लंकेश जाहीररीत्या समर्थन देतात, या घटनेचा कुणीच निषेध केल्याचं वा या घटनेवर टीव्हीवर वांझोट्या चर्चा झाल्याचं ऐकिवात किंवा पाहाण्यात नाही. दिवंगत व्यक्तीबद्दल चांगलं बोलावं, वाईट बोलू नये, या आपल्या संकेताचा इथेही सोयीनेच वापर केला जातोय असंच म्हणावं लागतंय. ही दोन्ही नांवं साम्यवादी विचारसरणींशी संबंधीत आहेत, असं माझं मत आहे. तसंच, नक्षलवादी आणि/किंवा साम्यवादी विचारसरणी देशभक्त म्हणून कधीही प्रसिद्ध नव्हती/नाही.

गौरी लंकेश नक्षलवादी किंवा/आणि साम्यवादी चळवळीशी संबंधीत होत्या हे आता स्पष्ट आहे. या दोन्ही विचारसरणी हिंदुत्ववादी किंवा/आणि राष्ट्रवादी विचारसरणींच्या थेट विरोधी विचारसरणी आहेत. म्हणून गौरी लंकेश किंवा तत्सम विचारांच्या व्यक्तींचे होणाऱ्या खुनात, हिंदुत्ववादी/राष्ट्रवादी विचारांच्या लोकांना थेट आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करणं कितपत योग्य आहे, हे माझ्या लक्षात येत नाही. काँग्रेस उपाध्यक्ष श्रीमान राहुल गांधींनी तर तसा थेट आरोपच जाहीररीत्या केलेला आहे. आपल्याशी न पटणाराच आपला खून करू शकतो, ही शक्यता जास्तीची असली, तरी तोच आपला खून करतो, हा विचारच मुळात चुकीचा आहे. सकाळ-संध्याकाळ आपल्यासोबत असणाऱ्यांनाच आपलं वाईट करण्याची संधी विरोधकापेक्षा जास्त असते, ही शक्यताच कोणी गृहीत धरत नाही. इथं मला जगप्रसिद्ध गुप्तहेर शेरलाॅक होम्सचं एक वाक्य आठवतं. होम्स म्हणतो, "जे होणारच नाही असं आपण समजतो, तेच होण्याची शक्यता जास्तीत जास्त असतं". गौरी लंकेशांच्या खुनासंदर्भात विरोधी विचारांच्या लोकांना आरोपीच्या पिजऱ्यात उभं करणाऱ्यांनी हेही लक्षात घ्यायला हवं.

गौरी लंकेश असोत किंवा केरळात पडत असलेले संघ स्वयंसेवकांचे खून असोत, त्यांचं समर्थन करताच येणार नाही. पण, असे खून का केले जातात वा पाडले जातात यावर समर्पक आणि समतोल विचार करणं गरजेचं आहे. न्यायाधीशांच्या भूमिकेत शिरण्याची गरज नाही. सामाजिक जगात कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या खुनांमागे प्रत्येकवेळी राजकारणंच असतं हा विचारही योग्य नाही, असं मला वाटतं.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा