शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जे भाष्य केलं आहे ते राज्याच्या आरोग्य व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तरूण डाॅक्टरांचं खच्चीकरण करणारं असून आपलीसुद्धा हीच अधिकृत भूमिका आहे का? असा प्रश्न महाराष्ट्र निवासी डाॅक्टरांची राज्यव्यापी संघटना असलेल्या ‘मार्ड’ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून विचारला आहे.
आपल्या पत्रात ‘मार्ड’ने लिहिलं आहे की, खासदार संजय राऊत यांची एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर मुलाखत प्रसिद्ध झाली. ज्यामध्ये त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. ज्यापैकी एक विषय कोरोना आजार, डाॅक्टर्स आणि जागतिक आरोग्य संघटनेबाबत होता. त्यांनी त्याबाबत केलेलं भाष्य हे जगजाहीर आहे आणि त्यात आपला देखील उल्लेख आहे.
एकीकडे आपणच बाेलायचे की डाॅक्टर्स कोरोना योद्धा आहेत आणि दुसरीकडे आपल्याच सहकाऱ्यांनी अशी वल्गना करावी, याचा आम्ही तरूण डाॅक्टरांनी काय अर्थ घ्यायचा? गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही दिवस-रात्र जीवाची बाजी लावून काम करत आहोत. आमच्यापैकी अनेकांनी आपल्या घरादाराचे, मायबापाचे तोंड कित्येक दिवस झाले बघितलेलं नाही. अनेकजण मृत्यूच्या दाढेतून परत आली आहेत, ‘डाॅक्टरांना काय कळतंय’ हे ऐकण्यासाठीच का?
हेही वाचा- डाॅक्टर तर देवदूतासारखे- संजय राऊत
दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात डॉक्टर देवदूतासारखं काम करत आहेत. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही. जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करावा. मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी डाॅक्टरांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा- मग, संजय राऊत बोलत असल्यानेच संशय वाढलाय- नारायण राणे