भाजपने महायुतीअंतर्गत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI. A.)साठी मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर ही जागा सोडली होती. मात्र या जागेवर शिवसेनेने आपला उमेदवार उभा केल्याने आरपीआयचे मुंबई अध्यक्ष आणि उमेदवार गौतम सोनावणे यांना ऐनवेळी निवडणुकीतून माघार घ्यावी लागली आहे. यामुळे आरपीआयचे कार्यकर्ते चांगलेच नाराज झाले आहेत.
महायुतीतील जागावाटाच्या सूत्रानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप १६४, शिवसेना १२४ आणि मित्रपक्ष १४ जागांवर लढत आहे. यापैकी मित्रपक्षांच्या बहुतांश जागा भाजपने कमळाच्या चिन्हावर लढण्यास भाग पाडल्याने मित्रपक्षांमध्ये नाराजी आहे.
यापैकी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या ‘आरपीआय’ला भाजपने माळशिरस, फलटण, पाथरी, नायगाव, भंडारा, आणि मानखुर्द शिवाजीनगर या ६ जागा सोडल्या होता. या ६ जागांवर आरपीआयने उमेदवारांची यादी जाहीर केली होती. परंतु या जागांवर शिवसेनेने आपल्या उमेदवारांना एबी फाॅर्म भरायला लावून मित्रपक्षांची दांडी गुल केली आहे.
गौतम सोनावणे आठवले यांच्या जवळचे मानले जातात. त्यांच्याबाबतही हीच तऱ्हा झाल्याने आरपीआय कार्यकर्ते नाराज झाले आहेत. परंतु आठवले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांना माघार घ्यायला लावली. त्यामुळे या मतदारसंघातून शिवसेनेचे विठ्ठल लोकरे रिंगणात आहेत. तसंच महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर सोनवणे यांच्यावर झालेल्या अन्यायाचं निवारण करण्यात येईल, असं आठवले यांचं म्हणणं आहे.
हेही वाचा-
भाजपने मला फसवलं, महादेव जानकरांनी व्यक्त केली खदखद
राज्यभरात ४० लाख बोगस मतदार, निवडणूक थांबवा - प्रकाश आंबेडकर