राज्य सरकारने भाजप खासदार नारायण राणे यांची कमी केलेली सुरक्षा व्यवस्था केंद्राने पुन्हा वाढवली आहे. यामुळे नारायण राणे यांना सुखाने झोप लागेल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. एवढंच नव्हे, तर राज्य शासनाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा केंद्राची पद्धत योग्य नाही, अशी नाराजी देखील शरद पवार यांनी व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप खासदार नारायण राणे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली होती. नारायण राणे यांची वाय प्लस सुरक्षा रद्द काढून घेण्यात आली होती. यावरून राणे कुटुंबाकडून राज्य सरकारवर बरीच टीका देखील करण्यात आली होती.
त्यानंतर मात्र आता नारायण राणे यांना केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून सुरक्षा काढल्यानंतर केंद्र सरकारने ही सुरक्षा दिली आहे. नारायण राणे यांच्या ताफ्यात १२ सीआयएसएफचे जवान तैनात असणार आहे. आगामी काळात भाजपच्या इतरही नेत्यांना सुरक्षा देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा- नारायण राणे यांना केंद्र सरकारकडून Y दर्जाची सुरक्षा
वाय दर्जाची सुरक्षा ही तिसऱ्या क्रमांकाची ही सुरक्षा व्यवस्था आहे. महत्त्वाचे परंतु तुलनेने कमी धोका असेलेल्या व्यक्तींना वाय श्रेणीची सुरक्षा दिली जाते. या व्यवस्थेत एकूण १२ सुरक्षा रक्षक असतात. ज्यामध्ये दोन प्रशिक्षित जवान असतात.
(sharad pawar reacts on narayan rane y security)