पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी सव्वा दोन लाखांहून अधिक मतं खेचली. शिवसेनेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला असला, तरी यातून शिवसेनेची ताकद दिसून आली. यामुळं भाजपाला नक्कीच घाम फुटला आहे. म्हणूनच २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत वनगाच शिवसेनेचे उमेदवार असतील, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं. गुरूवारी पालघरमध्ये मतदारांचे आभार मानण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत उद्धव यांनी ही घोषणा केली.
'संपर्क फाॅर समर्थन' दौऱ्या अंतर्गत भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र शहा यांच्या संपर्काला उद्धव यांनी समर्थन दिलं आहे का? हे अजूनही अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे पालघरच्या आभारसभेत उद्धव ठाकरे त्यावर भाष्य करणार का याकडेच सर्वांचं लक्ष लागलं होते. पण उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत अवाक्षरही काढलं नाही.
या सभेत उद्धव यांनी पोटनिवडणुकीतील ईव्हीएम घोटाळा, साम, दाम, दंड, भेद नितीवर टीका करत भाजपाला टार्गेट करण्याची संधी सोडली नाही. त्यामुळे युतीत काही अलबेल नसल्याचं, सेना स्वबळावर ठाम असल्याचेच संकेत उद्धव यांनी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
श्रीनिवास वनगा यांची पालघर जिल्ह्याचे संघटक म्हणून नियुक्ती करत पालघर पिंजून काढत लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आदेशही उद्धव यांनी दिले. आता नाटक सुरू असून पिक्चर बाकी आहे. २०१९ चा हिरो तूच (श्रीनिवास वानगा) असशील असं म्हणत उद्धव यांनी भाजपाला आव्हान दिल्याने शिवसेना स्वबळाच्या भाषेवर ठाम असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
भाजपाने साम, दाम, दंड, भेदाचा वापर करूनही शिवसेनेला सव्वा लाखांच्यावर मत मिळाली. ६ लाखांचं मतदान भाजापाच्या विरोधात झालं. त्यामुळं शिवसेनेला मिळालेली मत पाहता हा शिवसेनेचा विजय असल्याचं मी मानते, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला पुन्हा एकदा घेरलं.
हेही वाचा-
शिवसेना स्वबळावर ठाम - खा. संजय राऊत
शहांच्या संपर्काला उद्धव देणार का समर्थन?