Advertisement

अर्जुनाचा ‘बाण’ भात्यात

युती झाली तरी मैदान सोडलं नाही, युती झाली तरी सामना रंगणार असं म्हणणाऱ्या अर्जुनाचा बाण पुन्हा एकदा भात्यात गेलाच. युती असली तरी एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून दानवे-खोतकर ओळखले जात होते.

अर्जुनाचा ‘बाण’ भात्यात
SHARES

युती झाली तरी मैदान सोडलं नाही, युती झाली तरी सामना रंगणार असं म्हणणाऱ्या अर्जुनाचा बाण पुन्हा एकदा भात्यात गेलाच. युती असली तरी एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून दानवे-खोतकर ओळखले जात होते. परंतु पुन्हा एकदा उद्धवाच्या आशीर्वादानं आणि मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनं दानवे-खोतकर यांच्या मनात नसताही दिलजमाई झालीच.


जालन्याची लोकसभेची जागा या सर्वांचं मूळ म्हणावं लागेल. गेली दोन वर्ष एकमेकांवर अक्षरश: चिखलफेक केलेल्यांची एकदम मैत्री झाली कशी? हा अनुत्तरीत प्रश्नच म्हणावा लागेल. युती झाल्यानंतरही खोतकर यांनी दानवे यांना आव्हान देणं सुरूच ठेवलं होतं. जालना लोकसभेसाठी आपणच उमेदवारी दाखल करू असं २ वर्षांपासून खोतकरांचं म्हणणं होतं. उद्धव ठाकरे यांनी 'एकला चालो रे' ची भूमिका स्वीकारल्यानंतर खोतकर यांच्यासाठी दानवेंविरोधात उभं राहणअयासाठी रान मोकळं होतं. परंतु ऐनवेळी युतीचं घोडं गंगेत न्हालं आणि खोतकरांसमोरचा पेचही वाढला.

युतीनंतर जालन्याची जागा दानवेंच्या पारड्यात पडणार हे निश्चितच मानलं जात होतं. परंतु उम्मीद पे दुनिया कायम है असं आपण म्हणतो. तशीच एक आशा खोतकरही बाळगून होतं. परंतु दानवेंनी त्यांच्या आशेवर पाणी फेरलं. जालन्याच्या जागेसाठी खोतकरांनी सर्व काही प्रयत्न केले. आपल्या पक्ष प्रमुखांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांचीही चहापानाच्या निमित्तानं भेट घेतली. या भेटीनंतर सत्तार यांनीही खोतकर गुड न्यूज देणार असल्याचं जाहीर करून टाकलं. त्यानंतर रविवारी औरंगाबादेत उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, खोतकर यांची भेट झाली आणि तिकडेच माशी शिंकली. यानंतर सेनेच्या या अर्जुनानं उचललेलं धनुष्य खाली ठेवण्याची घोषणा केली.


खोतकर ज्यांना आव्हान देत होते ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत हे विसरून चालणार नाही. हा मुद्दा एका एका मतदारसंघापुरता असला तरी त्याला सर्वच ठिकाणी फार हवा देण्यात आली होती. त्यामुळंच का होईना खोतकर-दानवे वाद सर्वांच्याच परिचयाचा झाला होता. त्यातच युतीची घोषणा झाल्यानंतर खोतकर माघार घेतील किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील अशी शंका होती. परंतु इतर ठिकाणीही मध्यस्ती करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणीही मध्यस्ती करत हा प्रश्न मार्गी लावलाच. यामागे एकप्रकारची तडजोड आहे हे नक्कीच. परंतु त्या तडजोडीनंतर खोतकरांचं दिल्लीवारीचं स्वप्न भंगलंच. पण त्यानंतर त्यांचा चेहरा सर्वकाही सांगून जात होता. आगामी निवडणुकांमध्ये खोतकर युतीचे उमेदवार असतील आणि विधानपरिषदेवरही येतील, असं आश्वासन यावेळी दिल्याची माहिती कानावर पडलीच.



गेल्या ५ वर्षांमध्ये दानवे यांनी जालन्यात अनेक विकासकामं केली. त्याचा फायदा आपल्याला होईल हे दानवे यांना ठाऊक आहे. त्यातच गेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतांची आकडेवारी पाहिली तर खोतकर हे केवळ काठावर पास झालंत असंच म्हणावं लागेल. त्यांचा केवळ २९६मतांनी विजय झाला होता. रावसाहेब दानवे यांनी जालनामधल्या शिवसैनिकांना त्रास दिला, त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं त्यामुळेच रावसाहेब दानवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करायला आपण तयार नाही, असं अर्जुन खोतकर यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. खोतकर यांच्या मतदारसंघातल्या विकासकामांमध्ये दानवेंनी अडथळे आणले, या प्रकल्पांचा निधीही अडवून धरला, अशी तक्रारही खोतकरांकडून करण्यात आली होती. इतक्या टोकाच्या गेलेल्या वादानंतरही मुख्यमंत्र्यांनी दिलेला ‘डोस’ म्हणा किंवा उशीरा सुचलेलं शहाणपण म्हणा त्यांनी वेळीच माघार घेतल्याचं जाहीर केलं. आता अशातच विधानपरिषदेचं त्यांना मिळालेलं आश्वासन त्यांच्यासाठी जॅकपॉटच म्हणावा लागेल. त्यामुळं आता त्यांचा राग शमवण्यासाठी दिलेलं हे गाजर आहे की खरंखुरं आश्वासन हे येत्या काही महिन्यांमध्येच स्पष्ट होईल.




हेही वाचा -

रेल्वे भरतीत बाहेरचे घुसणार नाही यावर लक्ष ठेवा; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश

कर्ज थकवल्याने उन्मेष मनोहर जोशींची मालमत्ता जप्त



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा